Mumbai : महापालिकेचा डंका; 100 किलोमीटर जलबोगदे असणारे जगात दुसरे शहर

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पाणी पुरवठ्यासाठी जलबोगदे बांधणारी मुंबई महानगरपालिका भारतातील पहिलीच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था ठरली आहे. तर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे मुंबई महानगर जगातील दुसरे शहर ठरले आहे. मुंबईतल्या अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' यंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्पांतर्गत वडाळा ते परळदरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचा 'ब्रेक थ्रू' महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकल्पाचे ७४ टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण प्रकल्प एप्रिल २०२६पर्यंत नियोजित वेळेत पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आहे.

BMC
Mumbai : रमाबाई आंबेडकरनगरच्या पुनर्विकासाचे पाऊल पुढे; महिन्यात सल्लागाराची नियुक्ती

जल बोगद्याद्वारे एफ उत्तर (माटुंगा, वडाळा परिसर), एफ दक्षिण (परळ) त्याचप्रमाणे अंशतः ई (भायखळा) आणि एल (कुर्ला) विभागातील काही परिसराला पुरेसा व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. जलबोगदा खोदकामादरम्‍यान मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले भूजल पाझर, वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर तसेच बोगद्यामध्ये खडक ढासळणे अशा प्रकारच्या खडतर आव्हानांचा मुकाबला करत महापालिकेने दुसऱ्या टप्प्याचे खोदकाम नियोजित वेळेत पूर्ण केले आहे. कोविडच्या कठीण कालावधीतदेखील प्रकल्‍पाचे खोदकाम अविरतपणे सुरू होते. या जलबोगद्याचे खनन पूर्ण झाल्यामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत अमर महल ते वडाळा व पुढे परळ पर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' यंत्राद्वारे पूर्ण करण्यात आले आहे. भूमिगत जलबोगदा प्रकल्प अंतर्गत वडाळा ते परळ दरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचा 'ब्रेक थ्रू' झाला.

BMC
Mumbai Nashik Highway News : मुंबई नाशिक सुसाट... पण तूर्तास नाहीच! कारण काय?

पहिल्या टप्प्यातील हेडगेवार उद्यान ते प्रतीक्षा नगरदरम्यानच्या ४.३ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आले. ८ ऑगस्ट २०२२ रोजी हे काम पूर्ण झाले. प्रतीक्षा नगर ते परळ या ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे खोदकाम १ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू करण्‍यात आले. मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले भूजल पाझर, वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर तसेच बोगद्यामध्ये खडक ढासळणे या विविध आव्हानांवर मात करत दुसऱ्या टप्प्याचे खोदकाम यशस्वीरीत्या नियोजित वेळेत पूर्ण करण्‍यात महापालिकेला यश आले आहे. महापालिका आयुक्‍त भूषण गगराणी म्‍हणाले की, महापालिका प्रशासनाचे उत्‍कृष्‍ट नियोजन, कार्यक्षम व्‍यवस्‍थापन व तांत्रिक कौशल्‍यामुळे मुंबईकर नागरिकांना अखंड, सुरक्षित व पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. जगभरातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनांमध्‍ये मुंबईची पाणीपुरवठा व्‍यवस्‍था गणली जाते. पाण्‍याच्‍या वहनासाठी जलबोगदे बांधणारी बृहन्‍मुंबई महानगरपालिका भारतातील पहिलीच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था आहे. जलवितरण व्‍यवस्‍थेतील व्‍यवहार्य पर्याय म्‍हणून जलबोगद्यांचा वापर केला जात असून जलबोगद्यांद्वारे पाणी वहन केल्‍याने गळती व पाणीचोरीला आळा बसतो आहे. एकूण ९० किलोमीटर लांबीच्‍या प्रबलित सिमेंट काँक्रिट जल बोगद्यांतून दररोज पाणी आणले जाते. त्‍यात आता अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याची भर पडली आहे. मुंबईतील घराघरात पाणी पोहोचविण्‍यासाठी महापालिकेची महाकाय यंत्रणा २४ तास राबत आहे. उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करुन मुंबईकरांपर्यंत पाणी पोहोचवले जात आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com