Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

राज्यात पर्यटनमंत्री बदलले अन्‌ 204 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठली

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राज्यात सत्तेत आलेल्या महायुती सरकारने पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना सरसकट स्थगिती देऊन त्यातील अनेक कामे रद्द केली व त्या कामांना पुन्हा नव्याने मंजुरी दिली. मात्र, पर्यटन विभागाच्या कामांवर काहीही निर्णय घेतला जात नव्हता. ना ती कामे रद्द केली होती ना त्या कामांवरील स्थगिती उठवली जात होती. पर्यटन विभागाच्या १३२६ कोटींच्या कामांपैकी केवळ ५० कोटींच्या कामांवरील स्थगिती मार्च २०२३ मध्ये उठवण्यात आली होती. दरम्यान पर्यटनविकास मंत्रालय गिरीश महाजन यांच्याकडे आल्यानंतर पर्यटन विकास विभागाने २०४ कोटींच्या कामांवरील स्थगिती अखेर उठवली असून या कामांबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर राज्यात आलेल्या महायुती सरकारने एप्रिल २०२१ नंतर मंजूर केलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली होती. त्यात पर्यटन विभागाच्या १३२६ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. महाविकास आघाडी सरकार पडणार असे दिसू लागताच तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा अधिक कामांना मंजुरी दिल्याची चर्चा होती. यामुळे नव्याने आलेले पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या कामांवरील स्थगिती उठवण्याबाबत फारसा उत्साह दाखवला नाही.

एकीकडे डिसेंबर २०२२ पर्यंत बहुतांश विभागांनी स्थागिती दिलेली कामे एकतर रद्द केली किंवा त्यांच्यावरील स्थगिती उठवली होती. मात्र, मंगलप्रभात लोढा याबाबत काहीही निर्णय घेत नव्हते. त्यांनी २ नोव्हेंबर २०२२ ला २९२ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली. मात्र, त्यानंतर पंधरा दिवसांतच १६ नोव्हेंबरला तो शासन निर्णय मागे घेतला. यामुळे या कामांच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त होत होती. दरम्यान त्यांनी मार्च २०२३ मध्ये या १३२६ कोटींच्या कामांपैकी केवळ ५० कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला होता. उर्वरित कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी ठेकेदारांकडून मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करूनही स्थगितीबाबत काहीही निर्णय होत नव्हता. दरम्यान महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सामील झाल्यानंतर मंत्रालयांचे फेरवाटप झाले. त्यात पर्यटन विकास विभाग गिरीश महाजन यांच्याकडे आला. यामुळे या कामांवरील स्थगिती उठण्याची आशा निर्माण झाली होती. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे त्यांनी राज्यातील निवडक २०४ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली आहे. या कामांसाठी ७० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यत आली आहे.

नाशिकमधील ९० कोटींच्या कामांवरील स्थगिती उठली
पर्यटन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील ९० कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवण्यात आली  आहे. या स्थगिती उठवण्यात आलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने निफाड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील कामांचा समावेश आहे.