Narendra Modi Tendernama
टेंडर न्यूज

पीएम मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचा नारळ फुटणार; मुहूर्तही ठरला!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन ३० ऑगस्ट रोजी होणार असल्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीमध्ये मोठी वाढ होईल, असा दावा सरकारकडून केला जात आहे. वाढवण बंदर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरू शकते, असे मानले जात आहे.

दरम्यान, वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या दिवशी पालघर जिह्यातील सर्व मच्छीमारांसह बागायतदार व इतर सर्व नागरिक वरोर येथे मोठा जनसमुदाय जमा करून तेथून वाढवण बंदरापर्यंत प्रेतयात्रा काढून या कार्यक्रमाचा निषेध व्यक्त करणार आहेत. वाढवण हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर असून, येथे २० मीटरपेक्षा अधिक खोली आहे, त्यामुळे मोठी कंटेनर जहाजे सहज येऊ शकतात. बंदराच्या दोन्ही टप्प्यातील काम २९८ दशलक्ष टन क्षमतेच्या बंदराचे बनवले जाईल, ज्यामुळे भारतातील व्यापार आणि सागरी अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल.

प्रकल्पाला केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात समुद्रात उभारण्यात येणाऱ्या या बंदराच्या कामाला २०२५ च्या पावसाळ्यानंतर सुरूवात होईल. यासाठी १४४८ हेक्टर समुद्रात भराव टाकला जाईल. या बंदराच्या उभारणीसाठी ७७ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, २०२९ पर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. तर डहाणू येथील वाढवण बंदर हे देशातील सर्वोत्तम बंदर म्हणून गणले जाणार असल्याचे मत केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले आहे. गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत जेएनपीए बंदराच्या प्रशासन भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राज्याचे बंदर विभागाचे सचिव संजय सेठी व जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ हे उपस्थित होते. वाढवण बंदर केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. या बंदराच्या परिसरात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जेएनपीएकडून व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. वाढवण बंदर परिसरातील स्थानिक तरुणांना विविध प्रकारचे रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याची नोंद करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अॅपचे उदघाटन ही सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. जेएनपीएकडून वाढवण बंदराची उभारणी करण्यात येणार आहे. वाढवण बंदरात इको सिस्टीम तयार होणार आहे. या बंदरात दहा लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. याचा किनारपट्टीवरील रहिवाशांना लाभ होणार असून या बंदराची उभारणी निश्चित कालावधीत पूर्ण होणार आहे.