Devendra Fadnavis Tendernama
टेंडर न्यूज

Nashik : जलयुक्त नंतर सुरू केलेल्या 'या' 2 योजनांचा नाशिक जिल्ह्याला मोठा फायदा; तब्बल 3 हजार...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राज्य सरकारने जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar 2.0) योजना पुन्हा सुरू केल्यानंतर आता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेतून नाशिक जिल्ह्यात जलसंपदा व जलसंधारण विभाग यांनी यावर्षी उन्हाळ्यात चार लाख घनमीटर गाळ उपसा केला आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणे व बंधारे यांची १४ दलघफू साठवण क्षमता वाढली आहे. त्याचबरोबर जवळपास तीन हजार एकर शेतामध्ये गाळ पसरवून ते क्षेत्र सुपिक झाले आहे. (Jalyukt Shivar Abhiyan 2.0 - Devendra Fadnavis)

राज्य सरकारने २०१७ मध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना सुरू केली होती. या योजनेची मुदत २०२१ मध्ये संपल्यानंतर ती तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती. आता विद्यमान सरकारने पुन्हा ही योजना सरू केली आहे.

राज्यात २५० हेक्टरच्या आतील लाभक्षेत्र असलेल्या ८२,१५६ धरणांपैकी ३१,४५९ धरणांची साठवण क्षमता १५ हजार टीएमसी असून या धरणांमध्ये जवळपास १८०० टीएमसी गाळ साचला आहे. या गाळ उपसून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना सुरू केली होती. या योजनेतून आता सरकारने शेतकर्यांना त्यांच्या शेतात गाळ टाकण्यासाठी हेक्टरी ३७५०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

या उन्हाळ्यात जिल्हा जलसंधारण विभागाने नाशिक जिल्ह्यात जवळपास चार लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार जलसंपदा व जलसंधारण या विभागांनी शंभर टक्के उद्दिष्ट गाठले आहे. जूनपर्यंत हे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले नव्हते. मात्र, पाऊस लांबल्यामुळे जूनअखेरपर्यंत उद्दिष्ट गाठल्याची माहिती जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरीभाऊ गिते यांनी दिली.

जिल्ह्यात नाशिक जलसंपदा विभाग, पालखेड जलसंपदा विभाग व गिरणा जलसंपदा विभाग तसेच जलसंधारणच्या दोन्ही विभागांनी मिळून ४ लाख एक हजार घनमीटर गाळ धरणांमधून काढून तो शेतात पसरवण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.

एका एकरासाठी साधारणपणे ४० ट्रॉली गाळ दिला जातो. एका ट्रॉलीमध्ये तीन घनमीटर गाळ वाहून नेला जातो. यामुळे या गाळामुळे जिल्ह्यात तीन हजार एकरपेक्षा अधिक शेतजमीन सुपिक झाली आहे. तसेच गाळ काढल्यामुळे धरणांची साठवण क्षमता १४ दलघफू वाढली आहे.

यावर्षी जिल्ह्यातील मोठी धरणे ५० टक्क्यांच्या आसपास भरली असली तरी शून्य ते पाचशे हेक्टर सिंचनक्षमता असलेल्या धरणांमध्य अद्याप पाणी साठा झालेला नाही. यामुळे पावसाळ्यात या तलावांमध्ये साठा न झाल्यास आगामी काळात तेथेही मोठ्याप्रमाणावर गाळमुक्त धरण योजना राबवली जाऊ शकते.