Mumbai Delhi Highway Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai Delhi Expressway News : तब्बल 1 लाख कोटींच्या मुंबई-दिल्ली एक्सप्रेस-वेला का होतोय उशीर?

टेंडरनामा ब्युरो

Mumbai News मुंबई : महत्त्वाकांक्षी मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे (Mumbai Delhi Expressway) बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार आहेत. मार्च 2019 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पावर तब्बल 1 लाख कोटी रुपये खर्च होणार आहे. प्रकल्पाअंतर्गत 1350 किमी लांबीचा 8 लेनचा द्रुतगती महामार्ग बांधला जात आहे.

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग हा प्रकल्प व्यापाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. याअंतर्गत देशाची राजधानी दिल्लीला आर्थिक राजधानी मुंबईशी जोडण्यात येणार आहे. दिल्ली-मुंबई महामार्गाचा प्रमुख उद्देश व्यापारी राज्यांना थेट कनेक्टिव्हिटी मिळवून देणे हा आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात ही राज्ये थेट महाराष्ट्राच्या बंदराशी जोडली जातील. त्यामुळे व्यापाराला चालना मिळेल.

कोटामध्ये बोगद्याचे अपूर्ण असलेले काम, वडोदरा-दाहोदमध्ये रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे दिल्ली-मुंबई महामार्गाला उशीर होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोकसभा निवडणुकीपूर्वी या महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा दावा केला होता. मात्र हे काम अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. प्राधिकरणाने आता डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा दावा केला आहे.

एनएचएआयच्या प्रकल्प प्रभारींनीच याबाबत ताशेरे ओढत अनेक ठिकाणी कामात दिरंगाई झाल्याचा ठपका ठेवला आहे. प्रकल्पाच्या दिरंगाईमुळे मध्य प्रदेशसह अनेक राज्यांतील उद्योग-व्यवसाय महामार्गाने जोडले जाऊ शकले नाहीत. यामुळे या भागातील व्यवसायालाही गती मिळू शकली नाही. एवढेच नव्हे तर मालव्यात उभारण्यात येणारे लॉजिस्टिक पार्कचे कामही रखडले आहे.

या प्रकल्पा अंतर्गत मध्य प्रदेशात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे काम सुरू आहे. या महामार्गामुळे दिल्लीला महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदराशी सोहना एलिव्हेटेड कॉरिडॉर, दौसा, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत मार्गे जोडले जाणार आहे. यामुळे या भागातील व्यावसायिकांना बंदराची थेट कनेक्टिविटी मिळत कमी खर्चात माल निर्यात करता येईल.

या प्रकल्पात दिल्ली आणि वापी दरम्यान तीन ब्लॉकमध्ये काम होणार आहे. यातील एका भागात 20 किलोमीटरच्या रस्त्याचे काम रखडले आहे. दाहोदमध्ये 40 किमीच्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. कोटामधील 5 किलोमीटर लांबीचा बोगदा अपूर्ण आहे. या विलंबाचा रतलामवर परिणाम झाला आहे. येथे लॉजिस्टिक पार्कचे कामही रखडले.