Road Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai Coastal Road News : मुंबईकरांसाठी Good News! कोस्टल रोडमळे 'हा' प्रवास आता अवघ्या 12 मिनिटांत

टेंडरनामा ब्युरो

Mumbai News मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे (Mumbai Coastal Road Project) 89.67 टक्के काम पूर्ण झाले असून कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सागरी मार्गाला (Warali Bandra Sealink) जोडण्यासाठी बो स्ट्रिंग आर्च गर्डर जोडण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. जुलैअखेर नंतर कोस्टल रोडच्या मरीन ड्राईव्हवरून वरळी-वांद्रे मार्गावरील प्रवास अवघ्या 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प हा वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) टाकून दोन मार्गिका तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी दक्षिण मुंबईकडून उत्तरेकडे जाणारी मार्गिका जुलैअखेर नंतर सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू समुद्रात एकमेकांना जेथे सांधले जातात तेथील दोन खांबांमधील अंतर 60 मीटरवरून 120 मीटरपर्यंत करण्यात आले आहे. कोळी बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात मासेमारी करताना कोळी बांधवांना कोणतीही अडचण येणार नाही.

या रस्त्यामुळे मुंबईकरांची सुमारे 70 टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये सुद्धा 34 टक्के बचत होणार आहे. 10.58 कि.मी. लांब या सागरी मार्गावर १४ हजार कोटींचा खर्च झाला आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेले मुंबई हे भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक प्रमुख शहर आहे. दक्षिण मुंबईतील परिसर व्यापार उदिमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. सात बेटांनी तयार झालेल्या मुंबईचा भौगोलिक विस्तार उत्तर दक्षिण असा पसरलेला असल्याने येथील देशाच्या मुख्य भागाशी जोडलेले दोन मुख्य रस्ते देखील उत्तर दक्षिण असेच बांधलेले होते.

साहजिकच या रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब असे. तथापि मागील काही वर्षांत या रस्त्यांना पूरक असे नवीन रस्ते तयार होत असल्याने रहदारीची ही जटील समस्या कमी होऊ लागली आहे.