CM tendernama
टेंडर न्यूज

Missing Link News : मोठी बातमी! मिसिंग लिंकच्या उद्घाटनाचा मुहूर्त चुकणार; काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

Missing Link News मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai Pune Expressway) खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटरचा पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक (Missing Link) प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, खंडाळा खोऱ्यातील जोरदार पावसामुळे १८० मीटर उंचीवर सुरू असलेल्या दरी पुलाच्या बांधकामात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या प्रकल्पाला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पांतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीच्या दोन बोगद्यांचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे, तसेच दरी पुलाचेही काम वेगाने सुरू आहे. सध्या दरीपुलाचे ९०० मीटरचे बांधकाम राहिले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत दोन बोगदे व दोन व्हाया डक्‍टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे बोर घाटातील 6 किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. प्रकल्पातील बोगद्याची रुंदी 23.5 मीटर इतकी आहे.

मुंबईकडून पुण्याकडे येताना याच भागात एक किलोमीटर लांबीचा एक बोगदा आहे, तर पुण्याकडून मुंबईकडे जाताना सर्वांत मोठ्या लांबीचा म्हणजे नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा असून, या दोन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. पुढील काही महिन्यांत मिसिंग लिंकचे काम पूर्ण होईल, असा अंदाज एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मुंबई-पुणे द्रुतगती व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्‍झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्‍झिट ही रुंदी सहापदरी असून, या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून, दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात.

त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्‍वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले.

या माध्यमातून मुंबई-पुणे या दोन्ही शहरांमधील अंतर कमी करून प्रवासाचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न आहे. तसेच या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास करणेही अधिक सोयीस्कर होणार आहे.

डिसेंबर २०२४ अखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन होते. मात्र दरीपुलाच्या बांधकामात निर्माण होत असलेल्या अडथळ्यांमुळे या प्रकल्पाला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.