kasara tunnel Tendernama
टेंडर न्यूज

इगतपुरी ते कसारा अवघ्या 10 मिनिटांत; महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा लवकरच...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्यातील महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील 8 किलोमीटर लांबीच्या बोगद्यामुळे 12 किलोमीटर इगतपुरी ते कसारा घाटाचे अंतर ४० मिनिटांऐवजी अवघ्या आठ ते दहा मिनिटांत पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 नाशिकला जोडणाऱ्या कसारा घाटाला पर्यायी मार्ग झाल्याने वाहतूक जलदगतीने होणार आहे.

नागपूर ते मुंबई हे अंतर आठ तासांत कापता यावे यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. नागपूर ते मुंबई असा 701 किमीचा हा महामार्ग आहे. 701 किमी महामार्गापैकी 625 किमीचा महामार्ग म्हणजेच नागपूर ते इगतपुरी हा खुला झाला आहे. 4 ऑगस्ट 2024 पर्यंत समृद्धी महामार्गावरुन 1 कोटी 18 लाख वाहनांनी प्रवास केला आहे. आता उर्वरित 76 किमीचा महामार्ग लवकरच खुला होत आहे.

चौथ्या टप्प्यात पाच बोगदे आणि १६ पूल आहेत. इगतपुरी ते आमणे या टप्प्यातील आठ किमी बोगद्यामुळे कसारा घाट बायपास होणार आहे. सध्या कसारा घाटाचे 12 किमी अंतर कापण्यासाठी 40 मिनिटे लागतात. बोगद्यामुळे ते अवघ्या आठ ते दहा मिनिटात कापले जाणार आहे.

समृद्धी महामार्गावरच्या चौथ्या टप्प्यातला मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांना जोडतो. सह्याद्रीच्या खडतर पर्वत रांगांमधून मार्ग काढून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केले आहे. इगतपुरी येथील 8 किमीचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे. तसेच देशातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. या बोगद्याची रुंदी 17.61 मीटर इतकी आहे. तर या बोगद्याची उंची 9.12 मीटर आहे.

समृद्धी महामार्गाच्या या अखेरच्या टप्प्यात व्हॅली पूल बांधणे आणि बोगदे बांधणी हे सर्वात जिकिरीचे काम होते. काही ठिकाणी खडकांत 30 ते 40 मीटरपर्यंत खोदकाम करावे लागले. या टप्प्यात 16 व्हॅली पूल आहेत. पॅकेज 15 मध्ये खोल दरी असल्याने पुलाच्या खांबांची उंची 84 मीटर आहे, ती साधारण 25 ते 28 मजल्यांच्या इमारती इतकी आहे.

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा महामार्ग 11 डिसेंबर 2022 ला वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर हा 80 किमीचा मार्ग 26 मे 2023 या दिवशी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तर तिसरा टप्पा 4 मार्च 2024 या रोजी भरवीर ते इगतपुरी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.