Samruddhi Expressway Tendernama
टेंडर न्यूज

Samruddhi Mahamarg : तिसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला; तब्बल दीड तास वाचणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : देशातील सर्वात लांब असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भरवीर-इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे घोटी-सिन्नर मार्गावर वाहनधारकांचा प्रवासातील तब्बल दीड तास वाचणार असून त्यांना इगतपुरीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरमधील अंतर कमी करण्याबरोबरच वाहतुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तब्बल ७०१ किलोमीटर लांबीचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा पहिला टप्पा आणि शिर्डी ते भरवीरपर्यंतचे 80 किमी महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होऊन मार्गही खुला झाला आहे. त्यामुळे भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य झाले आहे. अद्यापही भरवीर- ठाणे जिल्ह्यातील आमणेपर्यंतचा १०१ किलोमीटरच्या माहामार्गाचे काम सुरू आहे. आता भरवीर ते इगतपुरी या २५ किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून तो लवकरच खुला केला जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या उच्चपदस्थांनी दिली.

सध्या नाशिक जिल्ह्यातील भरवीरपर्यंत समृद्धी महामार्गाचे काम झाले असून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यातून संभाजीनगर, नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना समृद्धी महामार्गावर जायचे असेल तर त्यांना ठाणे, भिवंडी, कल्याण परिसरातील वाहतूक कोंडीबरोबरच घोटी-सिन्नर मार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यानंतर भरवीर इंटरचेंजवरून समृद्धी मार्गावर जावे लागते. मात्र आता भरवीर-इगतपुरी टप्पा सुरू झाल्यास वाहनधारकांना थेट इगतपुरी येथूनच समृद्धी मार्गावर जाता येणार असल्याने वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे. मुंबई ते भरवीर या उर्वरित 200 किलोमीटरच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.