road Tendernama
टेंडर न्यूज

291 कोटींच्या काँक्रिट रस्त्याला तडे; ठेकेदाराकडून डांबरी मलमपट्टी

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : सुमार दर्जाचे साहित्य वापरून कोट्यवधींच्या कामाचा श्रीगणेशा करायचा अन् त्यातील दर्जा उघड झाल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करायची असेच काही औरंगाबादमधील बीड बायपास (Beed Bypass) रस्त्याच्या कामात झाल्याचे उघडकीस आले आहे. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची उभारणी करतानाच त्याला भल्यामोठ्या भेगा पडल्या आहेत, विशेष म्हणजे या आपल्या 'कामाच्या' चुका झाकण्यासाठी सिमेंटच्या रस्त्यावरील भेगा डांबराने बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय त्याचा हा विशेष वृत्तांत...

पैठण जंक्शन-झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौक रस्त्याला खड्डे आणि भ्रष्टाचाराचे लागलेले ग्रहण सुटण्याचे काही नावच घेत नाही. कायम खड्डेमय असलेला हा रस्ता सुस्थितीत आणण्यासाठी वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने १७.९ किमीसाठी २९१ कोटी रुपये मंजूर केले. विशेष म्हणजे बीओटी तत्त्वावर असलेल्या या रस्त्याची जबाबदारी सद्भाव इनफ्रास्ट्रक्चर कंपनीवर असताना हा रस्ता पुन्हा जागतिक बँक प्रकल्पाकडे वर्ग करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास २९१ कोटी रूपये मंजूर केले असून, संपूर्ण रस्ता आरसीसी पद्धतीने करण्यात येत आहे. परंतू हे काम काँक्रिटचे आहे की नाममात्र सिमेंट आणि दगडपावडर खडीचा वापर करून केलेले आहे हे दिसून येत आहे. रस्त्याचे काम चालू असतानाच रस्त्याला भेगा पडल्याने या कामाचा दर्जा काय हे दिसत आहे.

या अतिशय सुमार दर्जाच्या रस्त्याची फक्त सहा वर्षे ठेकेदार देखभाल करणार असून, आताच हा रस्ता निकृष्ट झालेला आहे. तर, सहा वर्षांनंतर याची जबाबदारी सरकारने का घ्यावी, अशी विचारणा औरंगाबादकर करत आहेत. या रस्त्याच्या बांधकामा दरम्यान जागतिक बँक प्रकल्प विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत केलेल्या सर्व तपासण्यांची सरकारमान्य आयआयटीच्या तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी औरंगाबादकरांनी केली आहे.

बीड बायपास या मार्गावर गेल्या दहा वर्षात दोनशेहून अधिक बळी गेल्याने हा रस्ता मृत्यूचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून प्रसिद्ध झाला आहे. रस्त्याच्या एकाबाजूने सुंदरवाडी, झाल्टा, गांधेली, बाळापूर, देवळाई, सातारा तर दुसऱ्या बाजूने मनपा हद्दीतील शेकडो वसाहतींच्या मधून हा रस्ता जातो. शिवाय नामांकित शिक्षण संस्था आणि मोठी रुग्णालय तसेच विविध हाॅटेल्स, मंगल कार्यालय, आणि बांधकाम मटेरियल्सची मोठी दुकाने व इतर जिवनाश्यक वस्तुंची दालने असल्याने या मार्गावर लाखो वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते. दरवर्षी रस्ता खड्डेमय व धुळीचे साम्राज्य तयार होत असल्याने शिवाय या मार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने २९१ कोटी रुपये मंजूर करुन काम सुरु केले.

मुळात बीओटी तत्त्वावर सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या जागतिक बँक प्रकल्पाकडेच हा रस्ता पुन्हा वर्ग केला. आता औरंगादेतील गुरुनानक इनफ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून हा रस्ता तयार होत आहे. परंतू पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौकापर्यंत १७.९० किमीचा २९१ कोटीचा सुरु असलेला रस्त्यावर एका ठिकाणी चार मोठ्या भेगा पडल्याचे टेंडरनामा प्रतिनिधीच्या पाहणीत समोर आले आहे. विशेष म्हणजे औरंगाबादेतील २४ कोटीतील सेव्हनहील ते सुतगिरणी चौक, गजानन मंदिर चौक ते जयभवानीनगर शिवाजी पुतळा, कामगार चौक ते महालक्ष्मी चौक, कासलीवाल पॅव्हलीयन ते संत तुकोबानगरी ज्योतीनगर-दशमेशनगर, चिश्तिया चौक ते बजरंग चौक या काँक्रिट रस्त्याची वाट लावणाऱ्या गुरूनानक इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीलाच हे काम देण्यात आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ज्योतीनगर रस्त्याप्रकरणी याच ठेकेदारावर दंडात्मक कारवाई देखील केलेली आहे. असे असताना निकृष्ट काम करणाऱ्या याच ठेकेदाराला बीडपास रस्त्याच्या बांधकामासाठी का निवड केली गेलो हा संशोधनाचा विषय आहे. नव्यानेच होत असलेल्या या बीडबायपासवर देखील अनेक ठिकाणी खड्डे व भेगा पडलेल्या आहेत. या आगोदर देखील शहरातील महापालिका व शासकीय निधीतून होत असलेल्या इतर ठिकाणच्या रस्त्यांचा निकृष्ट भाग काढून टाकण्याची वेळ ठेकेदारवर आली होती. मात्र २९१ कोटीचे आणि बीड बायपास सातारा- देवळाईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बीड बायपास या राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्याआधी निकृष्ट कामे औरंगाबादेतील राजकारणी आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना का दिसले नाही, असा अरोप होत आहे.

कोण काय म्हणाले...

या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत टेंडरनामा प्रतिनिधीने आमदार संजय शिरसाट यांच्याकडे विचारणा केली असता ठेकेदार अत्यंत चांगले काम करत आहे. लाॅकडाउनच्या काळात निधी नसताना त्याने काम सुरूच ठेवत शासनाला मदत केली. तर, दुसरीकडे जागतिक बँक प्रकल्पाचे उपअभियंता शरद सुर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या याची वाच्यता आणि हा प्रश्न आमच्याजवळ उपस्थित केला, इतर ठिकाणी बोलू नका अन्यथा लोक मारतील, असे म्हणत त्यांनी बेजबाबदारपणा सिद्ध केला.