Narendra Modi Tendernama
टेंडर न्यूज

मुंबई, पुण्यासाठी मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; 16 हजार कोटी अन् 8 मेगा टर्मिनल्स

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : येत्या पाच वर्षांत मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) नव्याने ८ मेगा टर्मिनन्स उभारण्यात येणार आहेत. याशिवाय मुंबईत २५० अतिरिक्त लोकल व शंभर मेल-एक्सप्रेस गाड्या सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पात राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी १५,९४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्यास मदत होणार असल्याचा दावा मंत्री वैष्णव यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशात दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक निधी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाला देण्यात आल्याचा दावा केला. महाराष्ट्रात ८१ हजार ५८० कोटी रुपयांचे नवीन मार्गिका, रेल्वे मार्गिकेचे दुहेरी आणि चौपदरीकरण, बुलेट प्रकल्प, रेल्वे कॉरीडॉरसारखे अनेक रेल्वे प्रकल्पांचे काम सुरु आहे.

अमृत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १२८ रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. तसेच वर्षभरात १८०  किमीचे नवीन रेल्वे मार्गिका टाकण्यात आल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्रात रेल्वेचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून राज्यात रेल्वेने सध्या १ लाख ३० हजार कोटींची गुंतवणूक केल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

येत्या पाच वर्षात मुंबईकरांच्या सोयीसाठी एमयुटीपी अंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहे. लोकल आणि मेल-एक्सप्रेसकरिता स्वतंत्र मार्ग उपलब्ध करुन देण्यासाठी मध्य रेल्वेवर कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान ५-६ वा रेल्वे मार्ग टाकण्यात येणार आहेत. विविध प्रकल्पांमुळे येत्या पाच वर्षांत उपनगरीय रेल्वे मार्गावर लोकलच्या नवीन २५० फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना गर्दीतून काहीसा दिलासा मिळेल, असा दावा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे.

मुंबई आणि पुण्यात ८ मेगा टर्मिनन्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये एकट्या महामुंबईत चार टर्मिनन्स असणार आहे. मध्य रेल्वेने मुलुंड, परळ, ठाकुर्ली ही टर्मिनन्ससाठी संभाव्य ठिकाणे निश्चित केली आहेत तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड परिसरातील टर्मिनस प्रस्तावित केले आहे. मेगा टर्मिनसकरिता अंदाजे ७.५ एकर जमिनीची आवश्यकता असते. या टर्मिनसमुळे नवीन शंभर मेल - एक्सप्रेस गाड्या चालविणे शक्य होईल.

संशोधन रचना आणि मानक संस्था (आरडीएसओ)द्वारे कवच ४.० ला मंजुरी मिळाल्यामुळे सर्व रेल्वेगाड्यामध्ये कवच ही स्वयंचलित सुरक्षा प्रणाली बसवली जाणार आहे. या प्रणालीमुळे रेल्वे अपघात टळण्यात मदत होणार आहे. युरोपच्या रेल्वेपेक्षा अधिक सुरक्षित प्रणाली असल्याचा दावाही रेल्वेमंत्र्यांनी केला.

बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असून २०२६ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे. बुलेट ट्रेनला वाहतुकीचे साधन म्हणून न बघता, बुलेट ट्रेनमुळे आर्थिक केंद्र विकसित होते, महत्वाच्या शहरांना जोडणारा दुवा म्हणून त्याकडे बघा असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.