Atal Setu Tendernama
टेंडर न्यूज

Atal Setu : बापरे! अवघ्या 3 महिन्यांत अटल सेतूला भेगा, रस्ता फूटभर खचला; कारण काय?

टेंडरनामा ब्युरो

Atal Setu News मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या ज्या अटल सेतूच्या (Atal Setu) रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फूट खाली खचल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अटल सेतूच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Mumbai Trans Harbour Link - MTHL)

Nana Patole अटल सेतू, एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधण्यात आला आहे. सुमारे 21.8 किमी लांबीचा 6 पदरी हा पूल असून समुद्रावर तो सुमारे 16.5 किमी लांबीचा तर जमिनीवर सुमारे 5.5 किमी लांबीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, तसेच देशातील सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतूची पाहणी करून रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावेळी पटोले म्हणाले की, शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारने १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असून सरकार स्वतःची घरे भरत आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या प्रकल्पाला दिले आहे, त्यांच्या नावाने भ्रष्टाचार करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे.

महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते पण महायुती सरकार तर १०० टक्के कमीशनखोर आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटनाआधी त्यांनी या प्रकल्पाची व्यवस्थित पाहणी तरी करायला हवी होती. पण मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपत घेऊन मंत्री बनवतात, असा आरोपही त्यांनी केला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे. एक टेकडीही फोडली असून पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. वसईच्या खाडीत पाईप लाईनचे काम सुरू असताना एक गरीब कामगार २० मीटर खाली दबला गेला, त्याच्यावर हजारो किलो लोखंड पडले. उच्च न्यायालयाने या सर्व घटनांमध्ये स्वतः लक्ष घालावे, असे पटोले म्हणाले.

हे सर्व प्रकार मुख्यमंत्री शिंदे यांच्याच खात्यात होत आहेत. सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल, काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारी सरकारला अधिवेशनात जाब विचारेल, असे पटोले यांनी सांगितले.

मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत : एमएमआरडीए
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. हा पोहोच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे स्पष्टीकरण मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) देण्यात आले आहे.

प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने 20 जून 2024 रोजी केलेल्या तपासणीदरम्यान, उलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक 5 अस्फाल्टवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या आहेत. या भेगा त्वरीत दुरूस्त करण्यासारख्या आहेत. अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज 4 चा कंत्राटदार, मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने या भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता 24 तासांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही एमएमआरडीएमार्फत कळविण्यात आले आहे.