Aditya Thackeray Tendernama
टेंडर न्यूज

Aditya Thackeray : पैसे देऊनही औषधांचा पुरवठा का नाही झाला? 700 कोटी गेले कुठे?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या जातात, मात्र महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या जात नसल्याने राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. कदाचित राज्यातील सरकारला पराभावाची भीती वाटत असावी अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या मृत्युचे कारण जाणून घेण्यासाठी आपण नागपूरला आलो असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील दोन-तीन जिल्ह्यांत मृत्यु संख्या वाढल्याचे दिसत आहे. त्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र यावर तोडगा काढताना राजकारण करू नये. हेच अधिष्ठाता, डॉक्टर आणि कर्मचारी असताना करोनात त्यांनी उत्तम कार्य केले होते. आता अचानक काय झाले, याची कारणे शोधावी लागतील.

औषधे द्या, राजकारण नको

औषध पुरवठा नियमित होत नाही. आधी तो हाफकिनकडून व्हायचा, सध्या कुठल्यातरी प्राधिकरणाकडून होत असल्याचे समजते. पावसाळ्यात रुग्णसंख्या वाढते. सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवून रुग्ण उपचारासाठी येतात. वैद्यकीय शिक्षण विभाग सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहे. आम्ही या मुद्दयावर आंदोलन करू शकलो असतो. मात्र विषय गंभीर असल्याने राजकारण करायचे नाही असे ठरवले आहे. न्यायालयाने सुमोटो घेतल्यावर आता सरकार जागे झाले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

औषधे घ्यायला निधी नाही का? 

रुग्णांच्या मृत्युची कारणे दाखवायची असतील तर 100 दाखवता येतील. मात्र औषध प्राधिकरणाला 700 कोटी रुपये देऊनही औषधांचा पुरवठा का करण्यात आला नाही, याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. आमच्या काळात कोविड होता. तो आम्ही व्यवस्थित हाताळला. सध्याच्या सरकारकडे आमदार विकत घ्यायला भरपूर पैसा आहे, परंतु गोरगरीब रुग्णांकरिता औषधे घ्यायला निधी नाही, असा टोलाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी लगावला.