CM Tendernama
विदर्भ

Wardha News : तुम्हाला उद्योजक व्हायचंय, मग अर्ज कराच!

टेंडरनामा ब्युरो

Wardha News वर्धा : दिवसेंदिवस ग्रामीण व शहरी परिसरात सुशिक्षित बेरोजगार युवक - युवतींची संख्या वाढते आहे. या युवकांना त्यांच्या मनासारखा रोजगार न मिळाल्यास तर कधी पैसे नसल्याने ते आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्या पार्श्वभूमीवर आता अशा सुशिक्षित युवकांसाठी एक नवी योजना सुरू करण्यात आली आहे.

उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या विविध संधींना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध दिले जाणार आहे. तर प्रकल्प किमतीच्या 35 टक्के अनुदान दिले जाते. गत वर्षी 390 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून यंदा 600 युवक-युवतींना नव उद्योजक होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शासनाच्यावतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत सन 2024-25 वर्षासाठी उद्योग व सेवा उद्योग उपक्रमांसाठी सुशिक्षित बेरोजगारांना 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारा व सर्जनशीलतेला कालानुरूप वाव देणारा सर्वसमावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

या योजनेला जिल्ह्यात दोन वर्षांपासून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून मागील वर्षी 390 कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर कर्ज प्रकरणे पोर्टलवर दाखल होत असून विविध बँक शाखांच्या माध्यमातून कर्ज प्रकरणांना मंजुरी मिळत आहे. सन 2024-25 साठी जिल्ह्याला 600 युवक-युवतींना वित्तीय वा संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 ते 45 वर्षे आहे, असे लाभार्थी पात्र असणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिकांना पाच वर्षे शिथिल आहे. 10 लाखांच्या प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता 7 वी पास, तसेच 25 लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास असावी.

या योजनेत सेवा उद्योग तसेच कृषिपूरक उद्योग, व्यवसायासाठी 20 लाख रुपये तसेच उत्पादन प्रकल्पाच्या प्रवर्गासाठी 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध असून एकूण प्रकल्प किमतीच्या शहरी भागासाठी 25 टक्के, तर ग्रामीण भागासाठी 35 टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी जास्तीत जास्त युवकांनी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.