PWD Tendernama
विदर्भ

ऐन पावसाळ्यात कंत्राटदाराकडून रस्त्याचे डांबरीकरण; किती दिवस टिकेल रस्ता?

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यातील दक्षिण भागात भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी येत असताना खड्यांमध्ये पाणी साचत आहे. अशाही स्थितीत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते विकासाचे काम सुरू असले तरी सध्या पावसाळा असल्याने डांबरीकरणाचे काम करता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या जिमलगट्टा ते देचलीपेठा रस्त्यावर किष्टापूर ते सिंधापर्यंत जवळपास 6 ते 7 किलोमीटर डांबरीकरण काम केले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रस्ते विकासकामाला कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, संबंधित कंत्राटदाराने भर पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम सुरू केल्याने हा रस्ता किती दिवस टिकणार, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावर केला आहे. यांनी उपस्थित केला आहे.

अहेरी तालुक्यात यापूर्वी देखील रस्त्याच्या कामात मुरूमऐवजी मातीचा वापर केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता. सध्या डांबरीकरणाचे काम सुरू असून त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याने संबंधित कंत्राटदार मनमानी कारभार करत असल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधींचा निधी रस्ते बांधकामासाठी येतो मात्र कंत्राटदार थातुरमातुर करून निधी वाचवण्यासाठी निकृष्ट दर्ज्याचे बांधकाम करतो. व त्याचा परिणाम लोकांवर होतो. लोकांना खराब रस्त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर खराब रस्त्यामुळे जिकडे तिकडे ट्रॅफिकची समस्या निर्माण होते.