Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

Nitin Gadkari : राज्यस्थानातील वाळवंटात जे जमले ते विदर्भातही करून दाखविणार!

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : विदर्भात खारे आणि गोडे असे दोन्ही जलाशय आहेत. मत्स्योत्पादनाला संधी आहे. राजस्थानसारख्या वाळवंटातून जर वर्षाकाठी दोन हजार कोटींची मत्स्यनिर्यात होऊ शकते तर विदर्भातून 50 हजार कोटींची निर्यात शक्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटतर्फे (एड) आयोजित आणि नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार औद्योगिक महोत्सव अॅडव्हांटेज विदर्भाच्या तिसऱ्या दिवशी विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रवींद्र वायडा, पुल्केश कदम, सुनील जांभुळे आदींची उपस्थिती होती.

पुल्केश कदम यांनी शोभिवंत माशांचे उत्पादन कमीत कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न देणारे असल्याचे सांगत मत्स्योत्पादनाला प्रक्रिया उद्योगांची जोड देण्याची गरज व्यक्त केली. विक्रम देशमुख यांनी मॉडर्न अॅक्वाकल्चर प्रॅक्टिसेसबाबत मार्गदर्शन केले. डॉ. उल्हास फडके यांच्या 'इकॉनॉमिक्स ऑफ इनलैंड फिशरीज' या पुस्तकाचे गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 

तलावांची करावी स्वच्छता :

पारंपारिक मत्स्यशेती करताना येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना मत्स्योत्पादक प्रभाकर मांढरे यांनी ज्या तलावांचे वय 40 ते 50 वर्षे जुने आहे. त्या तलावांची स्वच्छता करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तलावातील गाळ काढल्यास मत्स्यशेती अधिक दर्जेदार होईल याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच मागणीच्या तुलनेत मत्स्यबीजांचा पुरवठा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.