Nagpur Tendernama
विदर्भ

समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात होणार पूर्ण कारण...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : समृद्धी महामार्गाच्या यशस्वी निर्मितीनंतर नागपूर येथून मुंबई येथे पोहोचणे कमालीचे सुखद आणि जलद झाले आहे. समृद्धीने संभाजीनगरला अवघ्या चार तासात जाता येते मात्र संभाजी नगर येथून पुणे येथे पोहोचणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. यामुळे संभाजीनगर ते पुणे या सध्या अस्तित्वात असलेल्या वाहतूकीच्या कोंडीला टाळण्यासाठी नव्या महामार्गाची नितांत गरज होती. ही गरज ओळखून आता पूणे ते छत्रपती संभाजी नगर या 230 किलोमिटर सहा पदरी ग्रीन फिल्ड एक्स्प्रेससवेची निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करार होत आहे याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. 

हॉटेल रेडिसन ब्ल्यु येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ते छत्रपती संभाजी नगर या दोन महानगरादरम्यान नवीन एक्सप्रेस वे निर्मिती बाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासमवेत या एक्सप्रेसवे बाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मुख्य अभियंता  डी. एन. नंदनवार, उपसचिव मयुर गोवेकर आदी  मान्यवर उपस्थित होते.

हा नवीन एक्सप्रेसवे मराठवाड्यातील दृष्काळग्रस्त भाग असलेल्या बीड जिल्ह्यातील काही गावांना जोडून जात आहे. दृष्काळग्रस्त भागाला विकासाच्या नवीन वाटा याद्वारे मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले. हा महामार्ग पुणे येथील रिंग रोडला मिळेल. पुणे येथील ज्या ठिकाणी रिंग रोडला हा रस्ता मिळणार आहे त्या रिंग रोडसाठी भूसंपादन प्रक्रीया पूणत्वास आली आहे. पुण्यातील रिंग रोड रस्ताही एक्सप्रेसवेचे काम पूर्ण होईपर्यंत पुर्णत: तयार असेल असे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्ग आता आपण गोंदिया, चंद्रपूर पर्यंत जात आहे. नागपूर-गोवा महामार्गाला आता गती दिली असून या कामासंदर्भात आवश्यक त्या नोटीस काढल्या आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक भाग महामार्गाच्या जाळ्याशी जोडला गेला पाहिजे ही आमची भूमिका असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भक्कम साथ असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

दक्षिण ते उत्तर दिशांना जोडणारे महामार्ग मराठवाड्याला कवेत घेऊन पुढे जातील : नितीन गडकरी

पुणे ते छत्रपती संभाजी नगर या सध्या असलेल्या महामार्गावर वाहनांची वर्दळ ही अनेक पटीने वाढली आहे. काही दिवसापूर्वी मी स्वत: नगर ते संभाजी नगर मार्गावरील ही कोंडी अनुभवली. या दोन्ही महानगरांना जलद गतीने जोडणाऱ्या एक्सप्रेसवेची नितांत गरज होती. त्यादृष्टिनेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची निर्मिती आपण केली. सध्या असलेल्या मार्गालाही चांगले करण्याची गरज असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत व पूर्व पश्चिम भागांनाही जोडणारे महामार्गाचे जाळे आपण निर्माण केले आहेत. हा नवीन एक्सप्रेसवे मराठवाड्यातील काही भागाला कवेत घेऊन दक्षिण ते उत्तर दिशाशी जोडला जाईल असे त्यांनी सांगितले. सुरत पासून नाशिक मार्गे येणारा महामार्गावरुन या एक्सप्रेसवेवरुन सोलापूर महामार्ग व पुढे कर्नूल मार्गे कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास जलद होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.