E Bus Tender Tendernama
विदर्भ

नागपुरप्रमाणे आता चंद्रपुरातही धावणार प्रदूषणमुक्त वातानुकूलित 'ई-बस'

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : महापालिकेने 2024-25 च्या अर्थसंकल्पात ठेवलेल्या पीएम ई-बस सेवेचा प्रस्ताव अखेर केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावानुसार, 50 वातानुकूलित ई- बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, आयुक्त विपीन पालिवाल यांच्या परिश्रमने तयार झालेल्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे.

चंद्रपूर महापालिकेने 2024-25 च्या अर्थसंकल्पात ठेवलेल्या पीएम ई-बस सेवेचा प्रस्ताव अखेर केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावानुसार, 50 वातानुकूलित ई-बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. आयुक्त विपीन पालिवाल यांच्या कल्पक दृष्टिकोनातून तयार झालेल्या या प्रस्तावाचे केंद्र सरकार पुढे काय करते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वीज केंद्र, कोळसा खाणी व पोलाद उद्योगांमुळे चंद्रपूरकरांना वायू व हवा प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाहन प्रदूषणाची भर पडली. वातावरणातील जीवघेण्या घटकांमुळे विविध आजारांची तीव्रता वाढल्याचे शासनाचे अहवाल सांगतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, चंद्रपूर महापालिकेनेही ई-बसेस चालविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या प्रकल्पाच्या स्वरूपाबाबत आयुक्त विपीन पालिवाल यांनी सांगितले की, राज्य सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये 'पीएम ई-बस सेवा' या नावाने केंद्र- प्रायोजित योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना दोन श्रेणींमध्ये लागू केली जाईल. पहिल्या श्रेणीमध्ये शहर बससेवा व संबंधित पायाभूत सुविधा आणि दुसऱ्या श्रेणीत 'ग्रीन अर्बन मोबिलिटी इनिशिएटिव्ह'चा समावेश आहे. 

महापालिकेने केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडे दोन टप्प्यांत 50 ई- बसेसचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास चंद्रपूरच्या विकासातील हा आमूलाग्र बदल महत्वपूर्ण ठरेल. 'ई-बस'साठी शहरातील कृषी भवन परिसरातील मोकळ्या भूखंडावर बसस्थानक निर्माण केले जाईल. तीन लाख लोकसंख्येवरील शहरांना 50 ई-बसेस उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार महापालिकेने पहिल्या टप्प्यात 30 व दुसऱ्या टप्प्यात 20 ई-बसेस सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. पण इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, डेपो व अन्य व्यवस्थापनाचा खर्च चंद्रपूर मनपाला पेलणार का यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. चंद्रपूर शहर व लगतच्या 25 किलोमीटर परिसरातील 1 गावांपर्यंत बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या बसेस चंद्रपुरातून बामणी, बल्लारपूर, भद्रावती, घुग्गुस, आरवट-चारवट तसेच मूल मार्गावरील चिचपल्लीपर्यंत धावतील. केंद्रीय संस्थांकडून मंजुरी मिळाल्यानंतर म्हाडा आणि नवीन चंद्रपूर बसस्थानक, चार्जिंग स्टेशन व इतर सेवा केंद्र सरकारच्या निधीतून नागरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमाने उभारल्या जातील.

महापालिकेने केंद्र सरकारला 'ई-बस'चा प्रस्ताव सादर केला. कृषी भवन परिसरात 'पीएम ई-बस' सेवेसाठी पायाभूत संरचना उभारण्याची प्रशासनाची योजना आहे. 'सीएमसी'ला शहर बससेवा संचालनाचे कंत्राट दिले जाईल, अशी शक्यता आहे. बस चालवण्यासाठी सरकार प्रति किमी 25 रुपये अनुदान देईल. मुख्य बसस्थानक व 'पीएम ई-बस' स्थानक एकमेकांशी जोडले जाईल. साधारणतः वर्षभरात ही सेवा सुरू होईल, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. अशी माहिती चंद्रपूर महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिली.