Bridge Tendernama
विदर्भ

Wardha : गडकरींनी उद्घाटन केलेल्या 'या' उड्डाणपुलावर 2 वर्षातच पडला मोठा खड्डा

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : जिल्ह्यातील हिंगणघाट येथून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 44 वरील रस्त्यावरील नांदगाव चौक येथील शिवाजी महाराज उड्डाणपूलावर मोठा खड्डा पडला आहे. रस्त्याच्या अगदी मधोमध पडलेल्या या खड्ड्यामुळे अनेक अपघात होत आहेत. या खड्ड्यामुळे पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

तसेच यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. दोन वर्षा पहिले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाचे उद्घाटन केले होते. निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर मंत्री महोदय गडकरी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. कारण गडकरींच्या कित्येक भाषणात त्यांनी बांधकाम निकृष्ट दर्ज्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांना ते सोडत नाही तर त्यांच्याकडून चांगले काम करवून घेतले जाते असे ऐकले आहे. मग दोन वर्षातच या पुलावर मोठा खड्डा पडला तर असे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारासोबत काय केले जाईल याची सर्वांना प्रतीक्षा आहे. या महामार्गावरील उड्डाणपुलावरून प्रामुख्याने जड वाहने धावतात. तसेच विस्तीर्ण महामार्ग असल्याने चारचाकी वाहने सुसाट धावतात. काही काळ सुरक्षा कठडे दिसले, पण ते पुरेसे नसल्याची ओरड होत आहे. कारण वाहतूक नियमांचे पालन होत नाही. यावर त्वरित दुरुस्ती काम होणार असल्याचे सांगण्यात येते. पण हे काम काही सुरू झालेले नाही. हे काम म्हणजे निकृष्ट बांधकामाचा उत्तम नमुना असल्याची टीकाही सुरू झाली. 

शिवाजी महाराज उड्डाणपूलावरील खड्ड्यामुळे दुचाकी उसळून अनेक नागरिक आपटले, जखमी झालेत, मात्र उड्डाणपुलाची दुरुस्ती झालेली नाही. महामार्गावरील वाहतुकीस यामुळे अडथळे निर्माण होतात. वाहनचालकांना हा खड्डा चुकवून गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. या खड्ड्यामुळे पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यावर तात्पुरते जाड खर्डे ठेवण्यात आले. मात्र तरीही खड्डा झाकला जात नाही. तर राष्ट्रवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात केंद्रीय मंत्री गडकरींवर ताशेरे ओढले आहे. प्रशासन झोपेत असल्यामुळे एकूणच ढिम्म कारभार पहायला मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेत संताप वाढत चालला आहे. अलीकडच्या काळात भव्य महामार्ग तसेच उड्डाणंपुलांची बांधकामे झालीत. त्यामुळे वाहतूक सुकर झाल्याने नागरिक सुखावले. पण आता खड्डे पडणे, पथदिवे बंद असणे, वाहतूक नियमनाचा अभाव, असे व अन्य प्रकार डोकेदुखी ठरत आहेत. बांधकामापश्चात यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा कुठे गेली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पुलावर पडलेल्या खड्डयाची दुरुस्ती कधी केली जाणार याची प्रतीक्षा स्थानीय नागरिकांना आहे.