Bawanthadi Irrigation Project 
विदर्भ

Bhandara : बावनथडीच्या लाभक्षेत्रातील 'ही' 12 गावे का राहिली सिंचनापासून वंचित?

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : बावनथडी सिंचन प्रकल्पातून (Bawanthadi Irrigation Project) तुमसर तालुक्यातील 12 गावांना अद्याप सिंचनाची सुविधा उपलब्ध झालेली नाही. कोट्यवधींचा प्रकल्प असूनही त्याचा फायदा सिंचनाकरिता होत नाही. चांदपूर जलाशयातून बारमाही सिंचनाकरिता उपाययोजना करून बावनथडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी चांदपूर जलाशयात टाकण्याची गरज आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असून येथे नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी स्थिती येथे दिसत आहे.

माजी खासदार शिशुपाल पटले यांनी बावनथडी प्रकल्प, चांदपूर जलाशय व सोंड्या टोला उपसा सिंचन योजनेसंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सिंचनाकरिता असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा केली. यात सोंड्या टोला उपसा सिंचनचे नऊ पंप नियमित चालविण्यासाठी विद्युत विभागाकडे लोड वाढविण्यासाठी मंजुरीकरिता प्रस्ताव देणे, सोंड्या टोला उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करणे इत्यादी विषयांचा समावेश आहे.

बावनथडी सिंचन प्रकल्पाचे पाणी 

तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरातील गोबरवाही, पौनारखारी, येदरबूची, हमेशा, सुंदरटोला, सितासावंगी, सोदेपूर, गुडरी, खंदाळ, धामनेवाडा इत्यादी गावांना मिळत नाही. या गावातील शेतकऱ्यांच्या एकूण 1137 हेक्टर शेतजमिनीला सिंचनाची सोय होण्यासाठी डीपीआर तयार देण्यासाठी प्रस्ताव तत्काळ शासनाला पाठविण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता रवी पराते यांना दिल्या.

चांदपूर जलाशयातून बारमाही सिंचन होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या ओव्हरफ्लोचे पाणी चांदपूर जलाशयात टाकून जलाशयाचे वॉटर लेव्हल वाढविण्यावरही चर्चा करण्यात आली. बावणथडी प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे, उपाध्यक्ष अभियंता के.डी. दमाहे, उपविभागीय अभियंता चांदपूर जलाशय कांबळे इत्यादी अधिकारी उपस्थित होते. तसेच बावनथडी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता रवी पराते, शरद खोब्रागडे, डोमसिह वाघमारे, बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जगदीश गभणे, इन्व्हेस्टिगेशन सर्वेक्षण विभागाचे अभियंता के.डी. दमाहे, उपविभागीय अभियंता बानुबाकुडे, उपविभागीय अभियंता चांदपूर जलाशय कांबळे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

पुरेशा दाबाने विज मिळेना 

सोंड्या टोला उपसा सिंचन योजनेवर नऊ पंप बसविण्यात आले आहेत. परंतु नऊ पंप चालविण्याइतके विद्युत लोड नसल्याने एका वेळी नऊ पंप चालविता येत नाहीत. यामुळे नदीला पाणी असूनही उचलता येत नसल्याने चांदपूर जलाशय भरला जात नाही. परिणामतः शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांकडून वसूल होणाऱ्या वीज बिलाच्या पैशातून सदर योजना सौरऊर्जेवर चालविण्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना पटले यांनी या आढावा बैठकीत केली.