Jal Keevan Mission Tendernama
विदर्भ

Bhandara News : कंत्राटदार मालामाल, गावकरी मात्र तहानलेलेच; कोट्यवधींची योजना फसली

टेंडरनामा ब्युरो

Bhandara News भंडारा : प्रशासनातर्फे यांत्रिक पद्धतीने पाण्याचा शोध घेण्यात आला; परंतु हा शौध यंत्रणेच्या अंगलट आला आहे. यात गावकऱ्यांचा अभिप्राय घेण्यात आला नाही. हरदोलीच्या जलजीवन मिशनला पाणीपुरवठा करण्यासाठी कर्कापूर गावाच्या हद्दीत बोअरवेल्स देण्यात आले असले तरी पाणीच नसल्याने आता ही योजना गावक-यांसाठी पांढरा हत्ती ठरणार आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजनेत यंत्रणा आणि कंत्राटदार मात्र मालामाल झाले आहेत. 

हरदोली गावात नागरिकांना ग्रामीण पाणीपुरवठा नळ योजना अंतर्गत अपेक्षित पाणीपुरवठा होत नसल्याने 1 कोटी 41 लाख रुपये खर्चाची जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल नल योजना मंजूर करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याने गावकऱ्यांना गुंडभर पाणी मिळण्याची अपेक्षा होती परंतु गावात उलटेच झाले आहे. गावकऱ्यांना पाणी तर मिळाले नाही. योजनेला रेंगेपार गावच्या हद्दीतून वैनगंगा नदी पात्रात पंपगृह देण्याची मागणी ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.

गावच्या हद्दीचा अनुभव असणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांचा पाण्याचा शोध घेताना अभिप्राय घेण्यात आलेला नाही, यांत्रिक पद्धतीने यंत्रणा आणि कंत्राटदाराने गावाच्या शिवारात शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. कर्कापूर गावाच्या हद्दीत पाण्याचा शोध घेतला आहे. जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. गावकरी पारंपरिक पद्धतीने पाण्याचा शोध घेत असताना त्यात ते यशस्वी झाले आहेत. विहीर खोदकाम करताना हाच फॉर्म्युला गावकरी करीत आहेत; परंतु यांत्रिक पद्धतीने पाण्याचा शोध कर्कापूर गावाच्या हद्दीत घेतला असता यंत्रणेला अपयश आले आहे.

रेंगेपार गावहद्दीतून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाहीत. त्यात खर्च वाढणार असल्याने कंत्राटदाराने कानावर हात ठेवले. नदी पात्रातून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाहीत. यामुळे कोट्यवधीची योजना पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे. गावकरी मात्र सदैव तहानलेलेच राहणार आहेत. कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावरून ही योजना सध्या चर्चेत आली आहे.

कामाची विभागीय चौकशी करा 

तुमसर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत बहुतांश गावात कामे झाली आहेत; परंतु एकही समाधानकारक कामे झाली नाहीत. प्रत्येक गावात योजनेच्या गुणवत्तेवरून बोंबाबोंब आहे. या योजनेत यंत्रणा आणि कंत्राटदार गब्बर झाले असल्याची ओरड आहे. कोट्यवधी खर्च करण्यात आलेल्या जलजीवन मिशनच्या कामाची विभागीय व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी गावात होत आहे.