amravati tendernama
विदर्भ

Amravati : 40 कोटींच्या आमपाटी प्रकल्पातून पुन्हा येतोय गढूळ पाणी

टेंडरनामा ब्युरो

आमरावती (Amravati) : चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा येथे तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या आमपाटी प्रकल्पाच्या मुख्य विमोचकामधून सलग दुसऱ्या वर्षी गढूळ पाणी येत असल्यामुळे 40 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या प्रकल्पावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण कामाच्या चौकशीची मागणी आता करण्यात आली आहे. दुसरीकडे संबंधित विभागाच्या अभियंता यासंदर्भात अनभिज्ञ दिसून आले.

मेळघाटातील कोट्यवधी रुपयांची विकास कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे उदाहरण यामुळे पुढे आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी गांगरखेडा येथील आमपाटी धरणातून गढूळ पाणी निघत असल्याने कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आमपाटी साठवण प्रकल्प जलसंपदा विभागाच्या वतीने तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. या 64 हेक्टर जमिनीवरील प्रकल्पासाठी भूसंपादनासह 40 कोटी रुपये नाबार्ड अर्थसाहाय्य व इतर योजनेतून खर्च करण्यात आले. प्रकल्पस्थळी अजून इतरही कामे अपूर्ण आहेत. काहींच्या जमिनीच्या मोबदल्याचा वाद सुरू आहे.

या प्रकल्पातून चौदा गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शेतजमिनीकरिता ओलिताची व्यवस्था आहे. मात्र, तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पातून तीन वर्षांतच आठ दिवसांपासून जलवाहिनीतून गढूळ व मातीमिश्रित पाणी वाहत आहे.

गतवर्षी हीच स्थिती, प्रकल्प कमकुवत?

गतवर्षीसुद्धा सलग पंधरा दिवसापासून गढूळ पाणी जात असल्याने परिसरातील आदिवासीमध्ये दहशत पसरली होती. तसे पत्र तहसीलदारांना धनराज आठोले, दुर्गेश गाठे, अतुल बिलवे, हेमंत नागले, मारोती आठोले, निंबा आठोले, मनीष नागले, संजय नंदराम बेठेकर, सदानंद आठोले, गुलाब ब्राह्मणे, सुखदेव आठोले, स्नेहल नागले यांनी दिले होते. पुन्हा यावर्षी मुख्य विमोचक (एच आर जलवाहिनी) मधून गढूळ पाणी जात असल्याने प्रकल्प कमकुवत झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

गांगरखेडा येथील आमपाटी प्रकल्प विदाऊट पिचिंग यशस्वी झाला आहे. गढूळ पाणी वाहून जात असल्याची माहिती नाही. त्यासंदर्भात माहिती घेतली जात आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता आकाश मानकर यांनी दिली.