Railway Track Tendernama
विदर्भ

Akola : अखेर 8 वर्षांनंतर 'ते' स्वप्न प्रत्यक्षात उतरले; अकोलेकरांची कोंडीतून होणार सुटका

टेंडरनामा ब्युरो

अकोला (Akola) : गायगाव मार्गावरील डाबकी रोड रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. हा पूल शनिवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेले आठ वर्षांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा करीत होती, तो क्षण अखेर उजाडला. दिवाळीच्या पूर्व दिनी अकोला व बुलडाणा जिल्ह्याला जोडणारा रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुहूर्त सापडला आहे.

अकोला शहरातून तेल्हारा, निमकर्दा, गायगाव, शेगाव, जळगाव जामोदकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी व श्री संत गजानन महाराजांच्या भक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे. रेल्वे मार्गावरील फाटकामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आठ वर्षांनंतर का होईना प्रवाशांची सुटका होत आहे.

अपुरा निधी अन् आठ वर्षांची प्रतीक्षा

माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत डाबकी रोडी उड्डाण पुलासाठी २५ कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. परंतु अपुरा निधी व बांधकाम विभाग आणि रेल्वे विभागातील समन्वयाच्या अभावामुळे डाबकी रोडी उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास तब्बल आठ वर्षे लागलीत.

रेल्वे विभागाच्या नवीन नियमानुसार पुलाच्या नकाशात बदल करावा लागला. परिणामी पुलाचे काम रखडले. वाढीव निधीची गरज होती. केंद्र सरकार ‘सीआरएस’ मध्ये वाढीव निधी देण्याची तरतूद नसल्यामुळे सुमारे १२.७० कोटी रुपये राज्य शासनाला भरावे लागले. हा निधी मंजूर करण्यात तीन वर्षे निघून गेलीत.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करीत आमदार रणधीर सावरकर यांनी हा साडेबारा कोटी रुपयांचा निधी प्राप्त करून दिला. त्यामुळे डाबकी रेल्वे फाटकावरील दोन्ही बाजूने एकूण १४९.४० मीटर लांबीचा उड्डाणपूल व दोन्ही बाजूच्या पोच मार्गासाहित एकूण ५४९ मीटर बांधकाम पूर्णत्वात गेले आणि शनिवारपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होत आहे.

आमदार शर्माचे स्वप्न पूर्ण

भाजपचे ज्येष्ठ नेते आणदार गोवर्धन शर्मा यांनी डाबकी रोड रेल्वे उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे हे स्वप्न होते. त्यांच्या हयातीत ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यांचे नुकतनेच निधन झाले आहे. त्यामुळे कोणताही मोठा समारंभ न करता दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांच्या सोयीसाठी उड्डाणपुलाचे लोकार्पण केले जात आहे.