Exam Fee Tendernama
उत्तर महाराष्ट्र

सरकार परत करणार 21 कोटी रुपये! 'त्या' 2 लाख 38 हजार जणांना...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राज्य सरकारने मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ मध्ये ३४ जिल्हा परिषदांमधील पदांची भरती (ZP Recruitment) प्रक्रिया राबवली होती. मात्र, या परीक्षा नंतर रद्द करण्यात आल्या. या रद्द करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क (Exam Fee) परत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

त्यानुसार राज्यातील २,३८,३८० पेक्षा अधिक उमेदवारांची २१ कोटी ७० लाख ६४ हजार ४२२ रुपये परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवून उमेदवारांच्या यादीची पडताळणी करून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या गट-क मधील १८ संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ मध्ये ग्रामविकास विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. तसेच ऑगस्ट २०२१ मध्ये जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाची पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती.

दरम्यान ही भरती प्रक्रिया वेळेत राबवण्यात आली. या भरती प्रक्रियेत आकृतीबंध निश्चित करताना दिव्यांगांच्या जागा निश्चित करण्यात आल्या नव्हत्या. यामुळे या भरती प्रक्रियेला आक्षेप घेण्यात आला होता. भरती प्रक्रियेस झालेला उशीर व राज्य सरकारने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नवीन भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतल्याने २१ ऑक्टोबर २०२२ रोजी ही भरती प्रक्रिया रद्द केली.

यावेळी संबंधित भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने ११ एप्रिल रोजी ३४ जिल्हा परिषदांनी ही रक्कम परत करण्यासाठी मान्यता दिली होती. त्यानुसार कोकण विभागाच्या उपआयुक्तांनी सर्व जिल्हा परिषदांना २१ कोटी ७० लाख ६४ हजार ४२२ रुपये परत केले आहेत.

आता हे परीक्षा शुल्क संबंधित उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी https://mahardda.com या संकेतस्थळावर लिंक सुरू केली आहे.  याबाबत सर्व जिल्हा परिषदांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या माहितीची पडताळणी करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी, असे निर्देश दिले आहेत.

नाशिक जिल्हा परिषद १.७१ कोटी परत करणार
नाशिक जिल्हा परिषदेकडील २१ संवर्गांच्या भरतीसाठी १८,६७७ जणांनी अर्ज केले होते. या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून १ कोटी ७१ लाख ५८ हजार ८६३ रुपये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

सामान्य प्रशासन विभाग आता या सर्व उमेदवारांची पडताळणी करणार असून प्रत्येक उमेदवारास साधारणपणे ९७० रुपये परत करण्यात येणार आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिले.