Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये दोन महिन्यांत पूर्ण होणार गोदा सौंदर्यीकरण प्रकल्प

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : स्मार्ट सिटी कंपनीच्या गोदा सौंदर्यीकरण (प्रोजेक्ट गोदा) प्रकल्पाचे 65 टक्के काम पूर्ण झाले असून पुढच्या दोन महिन्यात 30 कोटींची कामे खर्च करण्याचे आव्हान आहे. या प्रकल्पातून गोदावरीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या गोदावरी उद्यान, दीपस्तंभ, बेसाल्ट फरशा, हायमास्ट बसवणे या कामाबरोबरच होळकर पूल ते गाडगे महाराज पुलापर्यंतचे काँक्रिटीकरण काढणे ही कामे करण्यात येत आहेत. ही कामे 31 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीतर्फे देण्यात आली.

गोदा सौंदर्यीकरण प्रकल्पासाठी

73.72 कोटी रुपये निधी स्मार्ट सिटी कंपनीकडून मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पात होळकर पुल ते गाडगे महाराज पुलादरम्यान नदीपात्रातील काँक्रीट काढणे, होळकर पुल ते गाडगे महाराज पुलापर्यंत नदीच्या दोन्ही तिरावर बेसाल्ट, दिपस्तंभ, बोलार्ड, हायमास्ट, बसवणे; रामवाडी पुल ते होळकर पुलापर्यंत दरम्यान गोदावरी नदीच्या डाव्या तिरावर संरक्षक भिंत बांधणे; ओपन एअर रेस्टॉरंट व मीस्ट उभारणे; बोर्डेक्स मिरर; ॲम्पी थीएटर व लेजर शो; हेरिटेज वॉल; फ्लोटींग जेट्टी व गोदापार्कचे सुशोभिकरण; संभाजी उद्यानाचे सौदर्यीकरण लेंडी नाला ते होळकर पुलापर्यंत डाव्या तिरावर गोदा वॉक वे; सुंदर नारायण मंदीर लगत पायऱ्या बसवणे आदी कामे करण्यात येत आहेत. नाशिक स्मार्ट सिटी कार्यालयाने 7 सप्टेंबर 2021 रोजी या कामांसाठी कार्यारंभ आदेश दिले आहेत. वर्षभरात 65 टक्के काम झाले असून या कामावर आतापर्यंत 45.43 कोटी रुपये खर्च झालेला आहे. उर्वरित कामे 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 

गोदा सौंदर्यीकरण  कामामध्ये रामवाडी पुलाजवळ नाशिककरांचे आकर्षण ठरणारे गोदा गार्डन साकारण्यात येत आहे. गेटवर पांच दगडी पीलर, ॲम्पी थिएटर, वॉक वे, ॲक्युप्रेशर पाथवे, सायकल मार्ग, बोटींगसाठी जेटी स्थानक, बबल जेट फाऊंटन मुळे पायऱ्यांवरुन घळघळणारे पाणी, ओपन एअर रेस्टॉरंट व त्यापुढे दिवसा धुक्यासारख्या इफेक्ट येण्यासाठी उथळ तळे व याच तळयात बोर्डेक्स मिरर इफेक्ट व्दारे ओपन एअर रेस्टॉरंटची प्रतिकृती पर्यटकांचे मन मोहित करेल, असे स्मार्ट सिटी कंपणीचे म्हणणे आहे. होळकर पुलाजवळील  संभाजी गार्डनचे सुशोभीकरणही करण्यात आले आहे. तसेच नदीच्या दुतर्फा विविध गवतांच्या प्रकारांनी हरितक्षेत्र तयार करण्यात येत आहे. अशा प्रकारे हरित, स्वच्छ, अध्यात्मिक क्षेत्र व नदी किनाऱ्यांमुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र बिंदु ठरणार असुन, गोदावरी नदीचे महातम्य व महत्व वाढून पर्यटनास मोठया प्रमाणात चालना मिळणार आहे नाशिकच्या आर्थिक विकासालाही हातभार लागणार आहे, असा दावा करण्यात येत आहे.

रामकुंड हीच नाशिकची ओळख आहे. देशभरातूनच नव्हे तर, जगभरातून भाविक येथे धार्मिक विधी करण्यासाठी येतात तसेच,अनेक पर्यटक भेट देण्यासाठीही येत असतात. या ठिकाणाली जसे धार्मिक महत्त्व आहे तसाच ऐतिहासिक वारसाही आहे. दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो त्यादृष्टीने त्याला एक वेगळे महत्त्व आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने गोदावरी काठ व घाटांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. यामध्ये दगडी घाट, बोलार्ड बसवणे, दीपस्तंभ बसवणे आदी कामे सुरू आहेत. प्रकल्पामुळे गोदावरीचे सौदर्य उजळून निघणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे स्मार्ट सिटी कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले.