Kikvi Dam Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : किकवी धरण 15 वर्षांपासून रखडल्याने नाशिककरांच्या तहानेला 1 TMC पाण्याची तूट

टेंडरनामा ब्युरो

Nashik News नाशिक : नाशिक शहराची २०४१ मधील लोकसंख्या गृहित धरून महापालिकेने २००९ मध्ये किकवी धरणाला मंजुरी दिली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरातील या धरणाची सुरवातीला २८३ कोटी रुपये असलेली किंमत आता १४०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

एकीकडे नाशिक महापालिकेला गंगापूर धरणातील पाणी अपुरे पडत असून २०२१ मध्ये किकवी धरणातून ११०० दलघफू पाणी मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात किकवी धरणाचे काम १५ वर्षांपासून रखडले असल्याने नाशिककरांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान याबाबत राजकीय पक्षांच्या व त्यांच्या उमेदवारांच्या पातळीवर सामसूम असल्याचे दिसत आहे.

नाशिक शहरास प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होत असून उर्वरित मुकणे व दारणामधून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणावर शेतीसाठी आरक्षण असल्यामुळे भविष्यातील वाढीव लोकसंख्येला गंगापूर धरण अपुरे पडणार आहे. दारणा धरणातून भविष्यातील वाढीव नाशिकला पाणीपुरवठा करण्यास मर्यादा असून मुकणे धरणातून केवळ १.५ टीएमसी पाणी आरक्षित आहे. यामुळे २०४१ पर्यंतच्या नाशिक शहराला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे किकवी धरण प्रस्तावित करण्यात आले आहे.

या धरणाची १५९६ दलघफू साठवण क्षमता असून ते सर्व पाणी नाशिक शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जाणार आहे. या प्रकल्पास राज्य सरकारने २६ ऑगस्ट २००९ रोजी २८३ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर ४ डिसेंबर २०१२ ला पाटबंधारे विभागाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक कार्यालयाकडून धरणाच्या आराखड्यास मंजुरीही दिली.

नाशिक महापालिका व जलसंपदा विभाग यांच्यात पाणी उपलब्धतेबाबत झालेल्या करारानुसार २०२१ पर्यंत किकवी धरणातून ११०० दलघफू पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र, या धरणाबाबत मधल्या काळात काहीही प्रगती न झाल्यामुळे इतर धरणांमधील सिंचनाच्या पाण्यावर त्याचा बोजा पडत असून नाशिककरांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

जलसंपदा विभागाने या धरणाबाबत २०१४ मध्ये टेंडर प्रक्रियाही पूर्ण केली होती. मात्र, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून टेंडर प्रक्रियेची चौकशी सुरू झाल्याने आणि हे प्रकरण न्यायालयात गेले, यामुळे काम सुरू होऊ शकले नाही.

या संदर्भातील खटल्याचा नुकताच निकाल नुकताच लागला असून, न्यायालयाकडून टेंडर प्रक्रियेस क्लिनचिट मिळाली आहे. यामुळे राज्य सरकारनेही त्या ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतल असला, तरी या धरणासाठी अद्याप भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या धरणासाठी ९१२ हेक्टर भूसंपादन करण्याची गरज आहे.

वनविभागाला १७२ हेक्टर जागेपोटी ३६ कोटी रुपये वर्ग करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. किकवी नदीवर १.६ टीएमसी क्षमतेच्या धरणासाठी १४०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असणार आहे. भूसंपादनासाठी ६०० कोटी, तर बांधकामासाठी ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

असा आहे किकवी प्रकल्प
ठिकाण :
ब्राम्हणवाडे, ता. त्र्यंबक
उपलब्ध पाणी : १५९६ दलघफू
खोरे : गोदावरी
पाणलोट क्षेत्र : ७० चौ.किमी.
पिण्यासाठी पाणी आरक्षण : १५९६ दलघफू