Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : नाशकातील 26 ब्लॅकस्पॉट हटवण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतरचा नवा मुहूर्त

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेचा नगररचना विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभाग यांनी मागील दीड वर्षांपासून एकमेकांकडे बोट दाखवत शहरातील २६ ब्लॅकस्पॉट (Black Spot) निर्मूलनाबाबत चालढकल केली असून आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याचे कारण देत पुन्हा एकदा हात वर केले आहेत. यामुळे यामुळे पुढील तीन महिने शहरातील अतिक्रमण हटाव प्रक्रिया लांबवण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर मार्गावर हॉटेल मिरची चौकात ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे खासगी बसचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये १३ प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत ब्लॅक स्पॉटचे तातडीने सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग, नाशिक महापालिका यांच्या समितीने शहरातील सर्व अपघात प्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार शहरात २६ ब्लॅक स्पॉट आढळून आले. अतिक्रमणे हटविण्याची कारवाई तातडीने करण्यासाठी प्रस्तावदेखील सादर झाले.

महापालिकेला पोलिस बळाची आवश्यकता होती. पोलिसांनी प्रस्तावानुसार बंदोबस्त, पुरवण्याचीदेखील व्यवस्था केली. मात्र, नगररचना व अतिक्रमण विभागातून टोलवाटोलवी झाल्याने अतिक्रमण काढले गेले नाही. ज्या भागात अपघात झाला, त्या हॉटेल मिरची चौकातील अतिक्रमणे महापालिकेने हटवली. इतर ठिकाणची अतिक्रमण जैसे-थे आहेत.

नगररचना विभागाकडून रेखांकन केले जात नसल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात येत आहे. याउलट अतिक्रमण विभागाकडून यादी मिळत नसल्याने रेखांकन करता येत नसल्याचे नगररचना विभागाकडून सांगितले जात आहे.

अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात २३ जानेवारी २०२३ त्याचप्रमाणे २० मार्च २०२३ पुढे ११ एप्रिल २०२३ त्यानंतर १२ जून २०२३ व ११ ऑगस्ट २०२३ असे पाच वेळेस नगररचना विभागाला स्मरणपत्र देण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत दखल घेण्यात आली नाही. अद्यापपर्यंत अतिक्रमण हटले गेले नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे कारण देत ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात चालढकल केली जात आहे.