Nashik ZP Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : नाशिक झेडपीसमोर 'जलजीवन'च्या 821 नाही, तर 765 योजना पूर्ण करण्याचे खरे आव्हान

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू असून ३१ मार्चपर्यंत ८२१ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून राज्याच्या पाणी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत तसे आश्वासन दिले आहे.

या मुदतीला आता केवळ २० दिवस उरले असताना प्रत्यक्षात त्रयस्थ संस्थांकडून केवळ ७६५ योजनांची दुसरी तपासणी झाली असून, त्यातील १२६ योजनांची तिसरी व केवळ आठ योजनांची चौथी तपासणी झाली आहे. यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागा २० दिवसांमध्ये ८२१ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठणे अशक्य दिसत असताना त्यांच्यासमोर दुसरी तपासणी झालेल्या ७६५ योजना पूर्ण करण्याचे खरे आव्हान आहे.

नाशिक जिल्हा परिेषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १४१० कोटींच्या १२२२ योजनांना मंजुरी दिली असून त्यातील बहुतांश कामे सुरू आहेत. यात अनेक पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे आतापर्यंत केवळ १०६७ योजनांच्या कामाची त्रयस्थ संस्थेकडून पहिली तपासणी झालेली आहे. अजूनही १५५ योजनांची कामे २५ टक्केही पूर्ण झालेली नाहीत. तसेच या १०६७ योजनांपैकी केवळ ७६५ योजनांच्या कामांची त्रयस्थ संस्थेकडून दुसरी तपासणी झाली आहे. याचाच अर्थ आतापर्यंत ७६५ योजनांची कामे ७० टक्क्यांपर्यंत झाली असून, त्यातील १३४ योजनांची कामे जवळपास पूर्ण झालेली आहेत.

उरलेल्या ६३१ योजनांची कामे मार्च अखेरपर्यंत तिसऱ्या चाचणीस पात्र करण्याचे आव्हान ग्रामीण पाणी पुरवठा विभागासमोर आहे. या विभागाने ते आव्हान पेलल्यास मार्च अखेरपर्यंत ७६५ योजना पूर्ण करता येणे शक्य आहे. या योजनांची तिसरी तपासणी झाल्यानंतर त्यातून पाणी पुरवठा करता येणे शक्य असून, ऐन उन्हाळ्यामध्ये संबंधित गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा करता येणे शक्य आहे. त्यानंतर चौथी तपासणी होऊन योजना हस्तांतरणाचा महत्त्वाचा टप्पा या मुदतीत पूर्ण होणे शक्य दिसत नाही.

३६० योजना पूर्ण झाल्याचा दावा
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी आतापर्यंत जलजीवनच्या ३६० योजना पूर्ण झाल्या असून, त्या योजनांच्या माध्यमातून संबंधित गावांना पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात त्रयस्थ संस्थेच्या तपासणी अहवालानुसार पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन तिचे हस्तांतरण झाल्याची संख्या जिल्ह्यात केवळ आठ आहे. तर तिसरी तपासणी झालेल्या योजनांची संख्या केवळ १२६ आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार ३६० योजनांची कामे पूर्ण झाली असतील तर त्यातील २२४ योजनांची अद्याप तिसरी व चौथी तपासणी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.