Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : मिर्ची चौकातील अपघातानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना महापालिकेचा ठेंगा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : येथील छत्रपती संभाजी नगर मार्गावरील हॉटेल मिर्ची चौकात मागील वर्षी आठ ऑक्टोबरला खासगी बसचा भीषण अपघात होऊन १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन शहरातील सर्व अपघाती ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्याची घोषणा करीत महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तसे आदेश दिले होते.

त्यानंतर महापालिकेने खासगी संस्थेच्या माध्यमातून शहरातील ब्लॅक सस्पॉटचे सर्वेक्षण केले. मात्र, आता वर्षे होत आले तरी महापालिका प्रशासन अद्याप केवळ समिती स्थापन करणे, पाहणी करणे, नोटिसा देणे असे खेळ खेळत असल्याचे चित्र आहे. यामुळे महापालिकेला अपघात स्थळे शोधून ते नाहीसे करण्यात कितपत रस आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाला अक्षरशःकेराची टोपली दाखवली आहे.

पंचवटी येथील छत्रपती संभाजी नगर मार्गावरील मिर्ची चौकात भीषण अपघात झाल्यानंतर।मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने नाशिक येथे आले व त्यांनी यापुढे अपघातच होणार नाही, यासाठी शहरातील सर्व ब्लॅक स्पॉट शोधून ते नाहीसे करण्याची घोषणा केली होती. तसेच मिर्ची चौकात उपाययोजना करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर महापालिकेच्या प्रशासनाने एका खासगी संस्थेकडून शहरातील सर्व अपघाती स्थळांचे सर्वेक्षण करून घेतले. या सर्वेक्षणात १०४ ब्लॅक स्पाॅट आढळून आलेत. त्यानंतर  नगररचना विभागाने या ठिकाणांची पाहणी करून मार्किंग करुन द्यावी असे पत्र अतिक्रमण विभागाने दिले. मात्र, मागील सहा ते सात महिने या दोन्ही विभागात निव्वळ पत्र प्रपंच सुरू आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मिर्ची चौकातील अतिक्रमणे काढली असून बांधकाम विभागाने त्या चौकात मोठमोठे गतिरोधक उभारण्यापालिकडे काहीही हालचाल केली नाही. तसेच शहरातील इतर भागातील चौकांमध्येही मोठमोठे गतिरोधक उभारले आहे. मात्र, ब्लॅकस्पॉट बाबत काहीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.आयुक्तांनी मध्यंतरी तंबी दिल्यानंतर  ब्लॅक स्पाॅट अहवाल तयार झाला व १ ऑक्टोबरपासून ब्लॅक स्पाॅटवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविला जाणार होत‍ा. त्यामुळे ब्लॅक स्पाॅट परिसर मोकळा होईल व अपघात टळेल ही अपेक्षा होती. मात्र, शहरातील ब्लॅकस्पॉट दूर करण्याबाबत महापालिका प्रशासनाने त्यांची नव्याने पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्रिसदस्यीय पथक स्थापन केले जाणार आहे. या त्रिस्तरीय पथकात अतिक्रमण, बांधकाम व नगररचना विभागातील प्रत्येकी एक अधिकारी असणार आहेत. यामुळे हे पथक पाहणी करणार, अहवाल देणार, त्यांनतर अतिक्रमण धारकांना नोटिसा देणे, त्यातील काहीजण न्यायालयात गेल्यास होणारा कालापव्यय बघता आणखी वर्षभर तरी त्यावर काही ठोस होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मिर्ची चौकातील भीषण अपघातानंरही महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत असून ब्लॅकस्पाॅट हटवण्याबाबत निव्वळ कालापव्यय सुरू आहे. यामागे अतिक्रमण धारकांना अभय देण्याचा हेतू असल्याचे बोलले जात आहे.

विभागनिहाय ब्लॅक स्पाॅट

नाशिक पश्चिम - १५

सिडको - २१

पंचवटी - २१

नाशिकरोड - २३

सातपूर - १०

ना.पूर्व - १४

बांधकाम, नगररचना व अतिक्रमण या तिन्ही विभागांचे पथक संयुक्त पाहणी करुन मार्किंग करेल. जेणेकरुन कोणाला न्यायालयात जाण्याची संधी राहणार नाही. त्यामुळे शहरातील ब्लॅक स्पाॅटची पुन्हा पाहणी केली जाणार आहे.

- नितीन नेर, प्रभारी उपायुक्त अतिक्रमण विभाग.