Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : नागरिकांशी चर्चा करून बनणार ‘नमामि गोदा’चा डीपीआर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या नमामि गोदा या प्रकल्पाचा प्रारुप आराखडा सल्लागार कंपनीने महापालिकेला सादर केल्यानंतर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दोन महिन्यांमध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश सल्लागार कंपनीला दिले आहेत. अलमोन्ड्स नांगिया ॲण्ड कंपनी या सल्लागार संस्थेने आता शहरातील नागरिक,तज्ज्ञ व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मते जाणून घेऊन त्यांच्या सूचनांचा या सविस्तर प्रकल्प अहवालात समावेश करावा, अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीचे प्रदूषण कमी करण्यासाठी नमामि गोदा हा प्रकल्प राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी १८२३ कोटी रुपयांना तत्वता मंजुरी दिली असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने अलमोन्ड्स नांगिया ॲण्ड कंपनी या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीने दोन हजार ७८० कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करून मागील महिन्यात महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे सादर केला आहे. या आराखडयातील कामे सिंहस्थापूर्वी पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पाचा आराखडा वेळेत केंद्र सरकारला सादर होणे गरजेचे आहे. यामुळे अलमोन्ड्स नांगिया ॲण्ड कंपनी या सल्लागार संस्थेने पुढील दोन महिन्यांमध्ये नमामि गोदाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

वाराणसी येथील गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नमामि गंगा प्रकल्पराबविण्यात आला आहे. त्याच धर्तीवर गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसह गोदाकाठाला हेरिटेज बनविण्यासाठी नमामि गोदा प्रकल्प राबवला जाणारआहे. या प्रकल्पाची संकल्पना तीन वर्षापूर्वी केंद्र व राज्यशासनाकडे मांडल्यानंतर या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी एक हजार ८२३ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही महापालिकेला देण्यात आले होते. परंतु, प्रशासकीय राजवटीत सातत्याने होणाऱ्या बदल्यांमुळे सल्लागार नियुक्तीची प्रक्रियाही लांबली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत यांनी या प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रियेद्वारे संबंधित सल्लागार संस्थेची नियुक्ती केली. विद्यमान आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी या प्रकल्पाला चालना दिल्यावर गेल्या महिन्यात सल्लागार संस्थेने या प्रकल्पाचा प्रारूप आराखडा सादर केला होता.

यांच्याशी होणार चर्चा
नमामि गोदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कमीत कमी चार वर्षांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे या सविस्तर प्रकल्प अहवालात पुन्हा बदल केले जाणार आहेत. यासाठी शहरातील बिल्डर, आर्किटेक्ट, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट, पत्रकार, पक्षांचे पदाधिकारी, समाजसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, फेरीवाले अशांचेही मत या प्रकल्पासाठी जाणून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.