Road Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : द्वारका चौक ते दत्तमंदिरपर्यंतची दुरस्ती दरवेळी पावसाळ्यापूर्वी उरकण्याची घाई का?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० चे नाशिकरोड ते द्वारका चौक या दरम्यान यापूर्वी सात वर्षांत दोन वेळा दुरुस्तीच्या कामासाठी १८ कोटी रुपये खर्च केल्यानंतर यावेळी १९.४२ कोटींच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, यावेळी डांबरीकरणाच्या कामानंतर वृक्षतोड केल्याने तेथील खड्डे तसेच असून डांबरीकरण सलगपणे न केल्याने रस्ता वरखाली झाला आहे. दरवेळी दुरुस्ती करताना पावसाळ्यापूर्वी काम उरकून घेतले जाते.  म्हणजे तीन वर्षांनी दुरुस्तीची खरी गरत असते, त्याच वेळी पावसाळ्यापूर्वीच दोष निवारण कालावधी संपतो. परिणामी दर चौथ्या वर्षी या रस्त्यावरील खड्ड्यांचा वाहनधारकांना सामना करावा लागत असतो. यावेळीही बरोबर जूनपूर्वी काम पूर्ण करून एक वर्षाचा दुरुस्तीचा खर्च टाळण्याची हुशारी यावेळीही खेळण्यात आली आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका चौक ते नाशिक रोड या सहा किलोमीटर रस्त्यासाठी गेल्या सात वर्षात १८ कोटी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था कायम आहे. या जूनमध्ये या रस्त्याचा दोष निवारण कालावधी संपल्याचे कारण देत ठेकेदाराने पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणने (सार्वजनिक बांधकाम विभाग) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे रस्ते दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने या दुरुस्तीसाठी १९.४२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. दरम्यान दर तीन वर्षांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असून रस्त्याची स्थिती जैसे थे असते. यामुळे या दुरूस्तीनंतर तरी या रस्त्याचा वनवास संपणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक पुणे महामार्गावर द्वारका चौक ते दत्तमंदिर या दरम्यान सहापदरी रस्ता असूनही दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्यांचे मजबुतीकरण झालेले नसल्याने रस्त्याचा पुरेसा वापर होत नाही. परिणामी या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी होत असते. यामुळे शहरवासीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यापूर्वी २०१६ मध्ये ८ कोटी रुपये रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर केले होते. तो रस्ता तीन वर्षांत नादुरुस्त झाल्यानंतर पुन्हा २०२० मध्ये १० कोटी रुपये रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर केले.  या दोन्ही वेळेस हा रस्ता दुरुस्तीची मुदत डिसेंबरपर्यंत असताना जूनच्या आत दुरुस्तीचे काम उरकून घेतले. यामुळे चौथ्या वर्षी पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था होऊनही दोषनिवारण कालावधी संपल्याचे कारण देत ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती करण्यात नकार दिला. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग (महामार्ग) यांनी मागीलवर्षी पावसाळ्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी या रस्त्याच्या दुरावस्थेसाठी १९.४२ कोटी रुपये मंजूर केले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने ८ वर्षांत ३८ कोटी रुपये खर्च केला आहे. यावेळी या रस्त्याचे रुंदीकरण करून त्याचे डांबरीकरण केले आहे. मात्र, डांबरीकरणाचे थर देताना ते सलगपणे न दिल्याने रस्ता वरखाली झाला आहे. परिणामी दुचाकी वाहन चालकांची त्यामुळे तारांबळ उडत आहे. तसेच डांबरीकरणाआधी वृक्ष हटविण्याचा विसर संबंधित विभागाला पडला आहे. यामुळे डांबरीकरणाचे काम झाल्यानंतर रस्त्याच्या कडेचे २४ वृक्ष तोडण्यात आले आहे. यामुळे या वृक्षांच्या ठिकाणचे मजबुतीकरण न होताच आता डांबरीकरण केले जाणार असल्याने पावसाळ्यात या वृक्षांच्या जागेवर खड्डे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  डांबरीकरणाचे काम झाल्यानंतर मार्गिकांवर पांढरे पट्टे, पादचाऱ्यांसाठी पांढरे पट्टे, दुभाजकांलगत असणारे रेडियम, गतिरोधकांवरील पांढरे पट्टे, साइडपट्टी दर्शविणारे पांढरे पट्टे, सिग्नलवरील पांढरे पट्टे आदी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अडचणी येत आहेत.