Samruddhi Expressway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : लोकसभा निवडणुकीपूर्वी 'समृद्धी'ची मिळणार आणखी एक गुड न्यूज!

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर या ८० किलोमीटरच्या या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मागील वर्षी मे मध्ये झाले. त्यानंतर १३ व्या टप्प्यातील म्हणजे त्या पुढील २५ किलोमीटरचा मार्ग फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

यामुळे लोकसभा निवडणुकीची आचार संहिता जाहीर होण्यापूर्वी भरवीर ते नांदगाव सदो या दरम्यानचा २५ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा भाग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या वाहनांना मुंबई-आग्रा महामार्गावरून समृद्धीवर जाण्यासाठी अत्यंत सोईचे होणार आहे. या ठिकाणी या दोन्ही महामार्गांमध्ये केवळ २७५ मीटर अंतर आहे.
 

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर शिर्डी ते इगतपुरी हा ८० किलोमीटरचा मार्ग मागील मे मध्ये खुला झाल्याने ६०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास सध्या सुरू आहे. त्यापुढील म्हणजे समृद्धीच्या १३ व्या टप्प्यातील इगतपुरी तालुक्यातील भरवीर ते नांदगाव सदो या दरम्यानच्या २५ किलोमीटरचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून आणखी महिनभरात म्हणजे फेब्रुवारीअखेरपर्यंत या रस्त्यांचे संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती महराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता कोळी यांनी दिली.

या २५ किलोमीटरच्या भागात २५० मीटरचा बोगदा असून ४५० मीटरचा एक पूल आहे. या २५ किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नांदगाव सदो येथे इंटरचेंज असणार आहे. या इंटरचेंजपासून मुंबई आग्रा महामार्ग केवळ २५० मीटर अंतरावर आहे. यामुळे मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी अत्यंत सोईचे होणार आहे.

या इंटरचेंजवर जाण्यासाठीचा २७५ मीटर रस्ता तयार झालेला आहे. या २५ किलोमीटरचा टप्पा खुला झाल्यानंतर मुंबईहून नागपूरच्या दिशेने तसेच नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना मुंबई-आग्रा महामार्ग व समृद्धी महामार्गावर जाणे सोईचे होणार आहे. या आधीच्या भरपूर येथील इंटरचेंजवरवरून वाहने खाली उतरल्यानंतर त्यांना मुंबई आग्रा महामार्गावर जाण्यास २० किलोमीटर एकेरी मार्गावरून जावे लागत असल्याने वाहनधारकांना गैरसोईचे होत होते. नांदगाव सदो येथील या नव्या इंटरचेंजमुळे वाहनधारकांची सोय होणार आहे.
 
जुलै उजाडणार
समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई दरम्यानच्या १३ टप्प्यांचे ६२५ किलोमीटचा मार्ग जवळपास पूर्ण झाला असून उर्वरित १४, १५ व १६ या टप्प्यांवरील कामे सध्या वेगाने सुरू आहेत. या तीनही टप्प्यांमधील महामार्गाची कामे पूर्ण होण्यास जवळपास जुलै उजाडणार आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई ते नागपूर हा संपर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकणार आहे.