Rojgar Hami Yojana Tendernama
उत्तर महाराष्ट्र

MGNAREGA : केंद्राने निधी थकवूनही राज्यात रोजगारहमीच्या निधी खर्चात 50 टक्के वाढ; विक्रमी 4,476 कोटींची कामे पूर्ण

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNAREGA) कामांमध्ये राज्यात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांनी वाढ विक्रमी वाढ झाली आहे. रोजगार हमी योजनेत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश झाल्यामुळे रोजगार हमीच्या कामांमध्ये वाढ झाली असून, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात कुशल व अकुशल मिळून ४४७६ कोटी रुपयांची कामे झाली आहेत.

विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेत कुशल व अकुशलचे ४०:६० टक्के प्रमाण राखणे अनिवार्य असताना राज्यात ते प्रमाण ३५: ६५ असे राखण्यात यश आले आहे. दरवर्षीप्रमाणे राज्यात अमरावती जिल्ह्यात या योजनेतून सर्वाधिक ४३८ कोटी रुपयांची कामे झाली आहेत.

एका आर्थिक वर्षात शंभर कोटींपेक्षा अधिक कामे केलेल्या जिल्ह्यांची संख्याही वाढून ती १८ झाली आहे. या वर्षी रोजगार हमीच्या कामांचा निधी वेळेवर येत नसून आताही नोव्हेंबरपासून केंद्र सरकारने निधी दिला नसूनही विक्रमी कामे पूर्ण झाली आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक कामांप्रमाणेच वैयक्तिक लाभाची घरकूल, फळबाग लागवड, गुरांचा गोठा, शोषखड्डे, बांधावरील फळ लागवड, सिंचन विहिर, विहिर पुनर्भरण, भात खाचरे, गांडूळ खत, तुती लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेततळे आदी कामे करता येतात. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या पातळीवर रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात वैयक्तिक लाभाच्या कामांचा मोठ्याप्रमाणावर समावेश होत आहे.

ग्रामपंचायत पातळीवर अकुशल व कुशलचे ६०:४० चे प्रमाण राखून सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या कामांचा आराखडा तयार केला जातो. या सर्व आराखड्यांना जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाते.

राज्यातील ३४ जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेतून कामे केली जातात. या सर्व जिल्ह्यांमध्ये २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४४७६ कोटींची कामे पूर्ण करण्यात आली आहे. त्या आधीच्या म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्यात २९८१ कोटी रुपयांची कामे करण्यात आली होती. या योजनेतून वर्षभरात ११ कोटी मनुष्यदिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे.

विभागात नाशिकची आघाडी कायम
नाशिक महसूल विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये नाशिक जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वाधिक १२७ कोटी रुपयांची कामे झाली असून त्या खालोखाल नंदूरबार (११७ कोटी), अहिल्यानगर (१०७ कोटी) व जळगाव जिल्ह्यात १०३ कोटींची कामे झाली आहेत. धुळे जिल्ह्यात केवळ ५६ कोटींची कामे झाली आहेत. धुळे जिल्ह्याने मागील वर्षाच्या (३६ कोटी) २० कोटींची अधिक कामे केली आहेत.

नाशिक जिल्ह्याचा मागील सहा वर्षाचा विचार करता २०१८-१९ मध्ये ७५.८३ कोटी, २०१९-२० मध्ये ५९.९३ कोटी, २०२०-२१ मध्ये ७२.२३ कोटी, २०२१-२२ मध्ये ६४.७२ कोटी, २०२२-२३ मध्ये १०१ कोटी व आता २०२३-२४ मध्ये १२७ कोटी रुपयांची कामे केली आहेत.

१८ जिल्ह्यांनी केला १०० कोटींपेक्षा अधिक खर्च
अहिल्यानगर : १०७
अमरावती : ४३८ कोटी
छ. संभाजी नगर : ३७८ कोटी
बीड : ३१८ कोटी
भंडारा : १२९ कोटी
चंद्रपूर : १८९ कोटी
गडचिरोली : १६६ कोटी
गोंदिया : २७७ कोटी
लातूर : २०४ कोटी
नांदेड :१९७ कोटी
नाशिक : १२७ कोटी
पालघर : २०१ कोटी
परभणी : १८८ कोटी
यवतमाळ : १८० कोटी
नंदूरबार : ११७ कोटी
जळगाव : १०३ कोटी
जालना : १९२ कोटी
हिंगोली : ११७ कोटी