Maharashtra Jeevan Pradhikaran (MJP) Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : मजिप्रच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची केवळ 58 टक्के कामे; अपूर्ण योजनांमुळे...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नाशिक जिल्ह्यात १११७ कोटी रुपयांच्या निधीतून ४१६ गावांसाठी ३८ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या योजनांची कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे जवळपास सर्वच योजनांना मुदतवाढ देण्यात आली असून या योजना अपूर्ण असल्यामुळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबवल्या जात असलेल्या गावांमध्येही टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती असताना त्यात जलजीवन मिशनच्या योजना वेळेत पूर्ण न झाल्याचाही फटका या गावांना बसत असून टँकरच्या पाण्यावर तहान भागवण्याची वेळ आली आहे.

केंद्र सरकारने जलजीवन मिशनची घोषणा करून ३१ मार्च २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाने शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यासाठी राज्यात जिल्हा परिषदांचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने ४१६ गावांसाठी ३८ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यातील सहा जुन्या योजनांचे विस्तारीकरण करण्यात येत असून उर्वरित ३२ योजना नव्याने प्रस्तावित आहेत. या योजनांचे सरासरी ५८ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. खरे तर या योजना पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२४ होती. मात्र, त्या योजना वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मागील पावसाळ्यात सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस पडला आहे. यामुळे जिल्ह्याच्या पूर्वभागात भर पावसाळ्यातही टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. त्यानंतर मार्चपासून टँकरची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ६८१ योजना भौतिकदृष्ट्या पूणॅ झाल्या आहेत. मात्र वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्यामधूनही गावांना पाणी पुरत्तठा होत नाही. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या विस्तारीकरण केले जात असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अपूर्ण असल्यामुळे संबंधित गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच नवीन प्रादेशिक योजनांना शाश्वत जलस्त्रोत आहे. मात्र, या योजना अपूर्ण असल्यामुळे त्यांच्याद्वारे अद्याप पाणी पुरवठा केला जात नाही. जीवन प्राधिकरणच्या ३८ पाणी पुरवठा योजनांसाठी सरकार १११७ कोटी रुपये खर्च करीत आहे. मात्र, या योजना वेळेव पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना काहीही उपयोग ठरत नाही. साधारणपणे या सर्व योजना पूर्ण होण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागू शकतो.

जीवन प्राधिकरणच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
एकलहरे पाणी पुरवठा योजना
शिंदे पाणी पुरवठा योजना
मनेगावसह २२ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
बारागावपिंप्रीसह सहा गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
फत्तेपूर निर्हाळे व चार गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
माळेगाव-मापारवाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
शहा व चार गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
वाघेरा व १४ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
चिंचवड व सहा गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
पिंपळगाव बसवंत पाणी पुरवठा योजना
लासलगाव विंचूर १४ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
येवला ३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
धुळगाव व १८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
दाभाडीसह १२ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
नांदगाव, मालेगाव, देवळा ७८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
सप्तश्रृंगगड पाणी पुरवठा योजना
घोटी बुद्रू पाणी पुरवठा योजना
आंबेवाडी व ८ गावे प्रादेशिाक पाणी पुरवठा योजना
सांगवी, गिरणारे व कुंभाडे प्रादेशिाक पाणी पुरवठा योजना
सुरगाणे व दोन गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
दहिवाळसह २५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
माळमाथासह २५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
चांदवड व ४४ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
 वडझिरे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
ओझर-साकोरा व दोन गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
रावळगाव पाणी पुरवठा योजना
पालखेड पाणी पुरवठा योजना
खेड व दोन गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
काळुस्ते पाणी पुरवठा योजना
साल्हेर पाणी पुरवठा योजना
झोडगे पाणी पुरवठा योजना
कजवाडे पाणी पुरवठा योजना
अहिवंतवाडी व सहा गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
मुळाणे व तीन गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना