Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : नांदगाव शहरासाठी 48 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : गिरणा धरणामधून नांदगाव शहरासाठी शाश्वत पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ४८ कोटी १२ लाख रुपयांच्या शहर समांतर नळपाणी पुरवठा योजने' ला सरकारने मान्यता दिली आहे. या मंजुरीमुळे नांदगावकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

सध्या नांदगाव शहराला नांदगावसह ५६ गावे या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना विस्कळित स्वरुपात चालवली जात असल्यामुळे नांदगावच्या रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहराचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पाणी पुरवठा योजनेचा प्रश्‍न सोडवण्यासाठी करंजवण धरणातून थेट जलवाहिनी मंजूर केली असून या योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजनही झाले आहे. त्यानंतर त्यांनी नांदगाव शहरासाठी समांतर पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली. या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर विषय मार्गी लागला आहे.

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या दालनात झालेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत पालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी या योजनेच्या एकूण प्रकल्पातील तांत्रिक तसेच आर्थिक बाबतचे सादरीकरण दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. ही नवीन पाणी पुरवठा योजना २०४१ ची लोकसंख्या गृहीत धरून तयार करण्यात आली असून या योजनेसाठी एक कोटी ४९ लाख रुपये खर्चाची गिरणा धरणाच्या उद्भव क्षेत्रात जॅकवेल उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी दीड कोटी रुपयाचे २२५ अश्वशक्तीचे उपसा पंप तर धरणापासून शहरातील ग्रामीण रुग्णालय मागील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ३५० मिमी व्यासाची अठ्ठावीस किमी लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या जलवाहिनीसाठी १९ कोटी ९७ लाख ६० हजार रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. या

पाणी पुरवठा योजनेते प्रतिदिन साठ लाख लिटर पाणी शुद्ध करणारा जलशुद्धीकरण प्रकल्प साकारला जाणार असून त्यासाठी ३ कोटी ७८ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचे वैशिष्ट म्हणजे वीज बिलाच्या कारणावरून योजना चालवण्यात अडथळा येऊ नये म्हणून हा प्रकल्प सौर उर्जेवर चालवला जाणा आहे. लक्ष्मीनगर व गुरुकृपानगर येथील प्रत्येकी चार लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी पंधरा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला चालना मिळाल्याने नांदगाव शहरातील रहिवाशांच वर्षानुवर्षांच्या पाणी टंचाईतून सुटका होण्यास मदत होणार आहे. मनमाड शहरासाठी करंजवन योजनेनंतर नांदगावचाही पाणीप्रश्न मार्गी लागल्याने नजीकच्या काळात नांदगाव टंचाईमुक्त झालेले दिसणार आहे.