Smart Card Tendernama
उत्तर महाराष्ट्र

RTO : छपाई ठेकेदार बदलल्याने 6000 हजार लायसन्स, आरसी बूक रखडले

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : आरटीओ कार्यालयाने वाहन चालवण्याचा स्मार्ट परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र यांची छपाई करण्याचे ठेकेदार ऑगस्टपासून बदलले आहेत. मात्र, तसे करताना जुन्या ठेकेदारांकडील स्मार्ट कार्ड व आरसी बुकबाबत कोणताही पाठपुरावा केला नाही. परिणामी ऑगस्टपूर्वी ज्या नागरिकांनी वाहन चालक परवान्यासाठी चाचणी दिली आहे अथवा वाहन नोंदणी केली आहे. अशा सहा हजार नागरिकांना अद्याप स्मार्ट कार्ड व आरसी बुक मिळाले नसून नागरिक आरटीओ कार्यालयात चकरा मारत आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहनांची नोंदणी केली जाते. तसेच वाहन चालवण्याची चाचणी घेऊन नागरिकांना वाहन चालवण्याचा परवाना दिला जातो. यासाठी स्मार्ट परवाना कार्ड व आरसी बुक वितरित केले जाते. या दोन्ही कागदपत्रांची छपाई करण्यासाठी नाशिक आरटीओ कार्यालयाने २००६ पासून रोझमार्टा कंपनीकडे आरसी बुक आणि युनायटेड टेलिकॉम लिमिटेड कंपनीकडे स्मार्ट कार्ड वाहन परवाना छपाईचे काम देण्यात आले होते. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला असून  मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन आरटीओ कार्यालयात ही छपाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार २२ ऑगस्ट २०२३ पासून जुन्या ठेकेदारांकडील काम काढून घेतले आहे. खरे तर आरटीओ कार्यालयाने वाहन नोंदवले अथवा वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी चाचणी घेतली म्हणजे ती यादी या छपाई ठेकेदारांकडे दिली जाते. त्यानुसार संबंधित छपाई खान्यातून ती कागदपत्र संबंधित व्यक्तीस पोस्टाद्वारे घरपोच पाठवली जातात. आरटीओ कार्यलयाने जुन्या ठेकेदारांकडील छपाई बंद केल्यानंतर त्यांना पूर्वी दिलेल्या यादीतील नागरिकांना कागदपत्रे पाठवली किंवा नाही, याबाबत आरटीओ कार्यालयाने काहीही तपास केला नाही तसेच पाठपुरावा केला नाही. परिणामी जून, जुलै व ऑगस्टमध्ये वाहन नोंदवलेले व वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी चाचणी दिलेल्या नागरिकांना ऑक्टोबर उजाडला तरी आरसी बुक व लायसन स्मार्ट कार्ड प्राप्त झालेले नाही. नागरिक आरटीओ कार्यालयात चौकशी करतात. मात्र,तेथून समाधान कारक।उत्तर मिळत नाही. या तीन महिन्यांमध्ये  आरटीओ कार्यालयातील सहा हजारांवर प्रकरणे प्रलंबित असताना त्याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. मागील ठेकेदारांचे करार संपल्यामुळे मागील प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचीही चर्चा आहे. 

असे चालते काम

आरटीओमार्फत आरसी आणि वाहन चालक परवान्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते छपाई खान्यात पाठवले जातात. तेथून छपाई झाल्यानंतर तेथून ती कागदपत्रे  मुख्य टपाल कार्यालयात पाठवली जातात. त्यानंतर कागदपत्रे संबंधित ग्राहक राहात असलेल्या परिसरातील टपाल कार्यालयात पाठवण्यात येतात. या ठिकाणी सर्व आरटीओकडून प्राप्त झालेल्या आरसी बुकचे लिफाफे बनवणे, पत्ता टाकणे आणि हे पाकीट पत्त्यावर पाठवण्याचे काम टपाल खात्याचे आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून आरटीओकडून आरसी बुक (स्मार्टकार्ड) आलेले नसल्याने पोस्टाला आरसी बुक  पाठविण्यास अडचणी येत असल्याने सहा हजारांवर आरसी  बुक आरटीओतच आहे. तशीच परिस्थिती वाहनचालक परवान्यांची आहे.