Railway Station Tendernama
पुणे

Vande Bharat : रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचाच! 'या' 2 गाड्या...

टेंडरनामा ब्युरो

Pune News : पुणे (Pune) : यंदा कोकण रेल्वे मार्गावरील मान्सून वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत न केल्यामुळे बुकिंग पोर्टलवर वंदे भारत (Vande Bharat Train), तेजस एक्सप्रेस (Tejas Express) सारख्या गाड्या १० जून २०२४ पासून रद्द असा संदेश दाखवत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोधळ उडालेला आहे.

प्रवासी सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर प्रतिवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. याअंतर्गत सर्व गाड्या नियंत्रित वेगाने चालवल्या जातात. यामुळे प्रवास वेळेत वाढ होते. याचा सर्वात जास्त परिणाम अतिजलद गाड्यांवर होऊन एका दिवसात मुंबईहून गोव्यात जाऊन परत येणाऱ्या गाड्यांचे आठवड्यातील दिवस कमी होतात.

हा परिणाम सध्या पावसाळी वेळापत्रक सुरू होण्याच्या आधीच रेल्वे प्रवाशांना बसत असून मान्सून वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत न केल्यामुळे बुकिंग पोर्टलवर १० जूनपासून वंदे भारत, तेजस एक्सप्रेस सारख्या वेगवान आणि सर्वाधिक पसंतीच्या गाड्या दिसत नाहीत. यामुळे या गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या की काय असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

भारतीय रेल्वेवर नियमित गाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी सुरू होते. त्यामुळेच पावसाळी वेळापत्रकात होणारे बदलही आरक्षण प्रणालीत तेव्हाच नोंद होणे अपेक्षित आहे. परंतु तसे अद्यापतरी झालेले नाही. त्यामुळे २२ ऑगस्ट, २०२४ साठीचे आरक्षण सुरू झाले असले तरी अजूनही मुंबई मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस यांसारख्या प्रीमियम गाड्यांचे आरक्षण ९ जून, २०२४ नंतरचे (१० जूनपासूनचे) आरक्षण सुरू झालेले नाही.

दरम्यान, याबाबत आयआरसीटीसीवर (म्हणजेच प्रवासी आरक्षण प्रणाली - PRS वर) प्रवाशांना दाखवण्यात येत असणारा संदेशही चुकीचा असून त्यावर "ट्रेन रद्द" असे नमूद केलेले आहे. त्यामुळे या गाड्या जूनपासून रद्द करण्यात आल्या आहेत का? अशी शंका प्रवाशांना येत आहे. त्यातच पुढील दहा दिवसांत कोकणात सर्वांत महत्वाच्या असणाऱ्या सणाच्या दिवसांतले म्हणजेच गणेशोत्सव काळातले आरक्षण सुरू होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर मध्य आणि कोंकण रेल्वेने लवकरात लवकर पावसाळी वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत करून सर्व गाड्यांचे आरक्षण सुरू करण्याची गरज असल्याचे मत रेल्वे प्रवासी संघटनांकडून व्यक्त केले जात आहे.