PMC Tendernama
पुणे

Pune : 'ते' टेन्शन गायब! आता पुणेकरांना बसणार नाही ‘शॉक’; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पावसाळ्यात पथदिव्यांच्या खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने नागरिकांना विजेचा धक्का बसण्याच्या घटना घडतात. अनेकदा नागरिकांच्या जिवावरही बेतते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका प्रशासनाने आता शहरात फायबर रिइन्फोर्स पॉलिमर (एफआरपी) ‘शॉक प्रूफ’ विद्युत खांब बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात म्हाळुंगे रस्ता, सूस अशा समाविष्ट गावांमध्ये एक हजार विद्युत खांब बसविण्यात येणार आहेत.

पावसाळ्यात विद्युत खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने किंवा रस्त्यांवर विविध प्रकारची कामे करताना खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरून नागरिकांना विजेचा धक्का बसण्याच्या घटना घडतात. विशेषतः पतंग उडविताना मुलांचा विद्युत खांबांना स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात काही जणांचा बळी गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. विद्युत खांबांमधील तांत्रिक त्रुटींकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची बाब समोर आली.

महापालिका प्रशासनाकडून त्याबाबत उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार, नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्त्वाचे असणारे ‘एफआरपी’ शॉक प्रूफ विद्युत खांब बसविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणी विद्युत विभागाकडून केली जात आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल म्हणाले, ‘‘शहरात केवळ ‘एफआरपी’ खांब बसविण्याचा आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिला आहे. सध्या विद्युत खांबांची तपासणी करून संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे.’’

असे आहेत फायदे

- ‘एफआरपी’ विद्युत खांब ‘शॉक प्रूफ’ असल्याने नागरिकांची सुरक्षितता वाढणार

- जुन्या विद्युत खांबांच्या तुलनेत ‘एफआरपी’ खांब ५ ते १० टक्के स्वस्त

- विद्युत खांब मजबूत, पारदर्शी, कमी वजनामुळे वापरण्यास सोपे

- गंज लागत नसल्याने विद्युत खांब दीर्घकाळ टिकण्याची शाश्‍वती

- आगीसारख्या घटनांमध्ये खांब वितळत नाहीत

दृष्टीक्षेपात

२ - विजेचा धक्का बसून झालेले मृत्यू

१ लाख ३० हजार - पथदिव्यांच्या खांबांची संख्या

२५०० - ‘एफआरपी’ विद्युत खांब

१००० - पहिल्या टप्प्यात ‘एफआरपी’ खांब

‘अर्थिंग’वरील खर्चात बचत

महापालिकेच्या विद्युत विभागाला दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विद्युत खांब व अर्थिंगची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी १० ते १५ लाख रुपयांचा खर्च करावा लागत होता. त्यामुळे विजेचा धक्का बसण्याच्या घटनांवर नियंत्रण आणता येत होते. ‘एफआरपी’ खांबाला अर्थिंगची गरज नसल्याने त्यावर दरवर्षी होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे.

शहरात ‘जीआयएस’ किंवा ‘एमएस’ विद्युत खांबांचा वापर केला जाणार नाही. त्याऐवजी नागरिकांसाठी अधिक सुरक्षित असणाऱ्या ‘एफआरपी’ विद्युत खांब बसविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

- श्रीनिवास कंदुल, प्रमुख विद्युत विभाग, महापालिका