Waste Management Tendernama
पुणे

Pune : पुणेकरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पालिकेने घेतला मोठा निर्णय; लवकरच करणार...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सोसायट्या, वस्त्यांमधील कचरा संकलित करण्याचे काम दुपारी बारा, एकपर्यंत सुरू राहत आहे. हे शहराच्या दृष्टीने योग्य नसल्याने सकाळी १० पर्यंत संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. यासाठी घरोघरी जमा होणारा कचरा गतीने संकलन व वाहतूक (Waste Management) करण्यासाठी प्रशासनाकडून छोट्या घंटा गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत.

शहरात रोज सुमारे २१०० ते २२०० टन कचरा जमा होतो. स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांसह क्षेत्रीय कार्यालयात झाडण काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पहाटेपासून कचरा गोळा करण्याचे काम सुरू होते. संकलित झालेला कचरा हा छोट्या टेम्पोमधून कचरा रॅम्पपर्यंत नेला जातो. तेथे मोठ्या कॉम्पॅक्टरमध्ये हा कचरा टाकून प्रक्रिया प्रकल्पांच्या ठिकाणी पोचविला जातो. ही सर्व प्रक्रिया दुपारी १२ ते एकपर्यंत चालत आहे.

शहर दिसते घाण

सकाळच्या वेळेत शहर स्वच्छ असले पाहिजे, पण नागरिक कामानिमित्ताने बाहेर पडायला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतो. भटके कुत्रे, अन्य प्राणी त्यामध्ये अन्न शोधत असल्याने घाण होते, दुर्गंधी पसरत असते. नागरिक घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांना शहरातील कचरा पूर्णपणे उचललेला गेला असल्याचे नजरेत पडले पाहिजे यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे.

कचरा वाहतुकीत अडथळा

घनकचरा विभागाकडे सध्या एकूण ७५० गाड्या कचरा वाहतुकीसाठी आहेत, त्यापैकी सध्या २४० छोट्या घंटागाड्या आहेत. घरोघरी व रस्त्यावर पडणारा कचरा सकाळी लवकर गोळा केल्यानंतर हा कचरा वाहून नेण्यासाठी महापालिकेकडे २४० घंटागाड्या अपुऱ्या पडत आहेत. एकाच गाडीला दोन ते तीन फेऱ्या माराव्या लागत असल्याने रॅम्पवर कचरा पोचविण्यास उशीर होत आहे. त्यामुळे घंटा गाड्यांची संख्या वाढविल्यास सकाळी १० पर्यंत संपूर्ण कचरा उचलून तो रॅम्पवर पोचविणे शक्य आहे. त्यामुळे किती गाड्यांची गरज आहे याचा अभ्यास प्रशासनाने सुरू केला आहे.

दृष्टिक्षेपात

शहरात रोज निर्माण होणारा कचरा - २१०० ते २२०० टन

कचरा वाहतुकीसाठी वाहने - ७५०

एकूण कचरा प्रकल्प - २५

एकूण स्वच्छता कर्मचारी - १५०००

दुपारपर्यंत कचरा वाहतुकीचे काम सुरू राहणे शहराच्या दृष्टीने योग्य नाही. हे काम सकाळी १० पर्यंत पूर्ण व्हावे यासाठी छोट्या घंटागाड्यांची संख्या वाढविणे आवश्‍यक आहे. चालू अर्थसंकल्पात गाड्या घेण्यासाठी तरतूद उपलब्ध असून, नेमक्या किती गाड्या आवश्‍यक आहेत याचा अभ्यास केला जात आहे.

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका