Pune Chhatrapati Sambhajinagar Highway Tendernama
पुणे

Pune - Sambhajinagar Highway : पुणे - छत्रपती संभाजीनगर महामार्गाबाबत एमएसआयडीसीने काय घेतला निर्णय?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाची (Pune - Chhatrapati Sambhajinagar Highway) क्षमता वाढविण्याबरोबरच नव्याने पुणे-छत्रपती संभाजीनगर ग्रीन कॅरिडोअरची (Pune - Chhatrapati Sambhajinagar Green Corridor) उभारणी करणे, अशी दोन्ही कामे स्वतंत्रपणे हाती घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ही दोन्ही कामे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपेन्ट कॉर्पोरेशनकडे (एमएसआयडीसी) देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात जुन्या महामार्गावर चार नवीन उड्डाणपूल आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) माध्यमातून पुणे-छत्रपती संभाजीनगर आणि पुणे-बंगलोर या दोन ग्रीन कॅरीडोअरचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती.

या कंपन्यांकडून प्रायोगिक तत्त्वावर रस्त्याचे आरेखन करून सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू होते. त्यानुसार सल्लागार कंपनीकडून प्रारूप आराखडाही तयार करण्यात आला. असे असताना सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारडून ‘एमएसआयडीसी’ची स्थापना करण्यात आली.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी हे काम ‘एमएसआयडीसी’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर सध्या असलेल्या पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम हे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. मध्यंतरी एमएसआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यात एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये ग्रीन कॅरिडोरसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे सध्या जुन्या महामार्गाची क्षमता वाढविण्याला प्राधान्य द्यावे. त्यानंतर ग्रीन कॅरिडोअरचे काम हाती घेण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार जुन्या महामार्गाच्या सक्षमीकरणाच्या कामाचा आराखडा तयार करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

दरम्यान, पुणे शहराच्या हद्दीत रामवाडी ते शिरूर या उड्डाणपुलाचादेखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. प्राधान्याने जुन्या रस्त्याचे काम सुरू करणे आणि त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरचे काम सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय कामे होणार?

सध्याच्या महामार्गावरून दररोज जाणाऱ्या वाहनांची संख्या २५ ते ३० हजार आहे. ही संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्याचा रस्ता हा २४ मीटर रुंद असून, चार लेनचा आहे.

या महामार्गावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी रुंदीकरण करणे, महामार्गावर चार ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, महामार्गावर सध्याचे असलेले टोल प्लाझा काढून टाकणे, रस्त्याच्या साइड पट्ट्यांचे डांबरीकरण करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, यांचे इस्टिमेट (पूर्वगणनपत्रक) तयार करण्याचे काम सुरू आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.