Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar Tendernama
पुणे

Pune News : पुणे जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या 'त्या' प्रकल्पाला सरकारचा हिरवा कंदील कधी मिळणार?

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : पुणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध करून देणारा आणि शेतीलाही पुरेसे पाणी देणे शक्य होणाऱ्या खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पाचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी पडून आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यामध्ये तरी या प्रस्तावाला मान्यता मिळणार का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी नेण्याची योजना जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आली आहे. जलसंपदा विभागानेच या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला.

या अहवालाला जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आणि त्यांनतर राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने (स्टेट लेव्हल टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी कमिटी) मान्यता दिली आहे. या योजनेसाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेमुळे सुमारे अडीच टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची बचत होणार आहे.

या प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट्‌स बँकेने कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून दोन हजार २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव बँकेला सादर करण्यात आला आहे. दुसरीकडे जलसंपदा विभाग कालवा बंद करणार आहे. त्यामुळे ती जागा रिकामी होणार आहे. ही जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी आणि त्याबदल्यात ‘टीडीआर’ द्यावा, असा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला आहे. त्यामुळे सर्व प्रकाराच्या मान्यता मिळाल्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आहे. त्याला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.

मध्यंतरी लोकसभा निवडणुकीमुळे हा प्रस्ताव लांबणीवर पडला होता. आता आचारसंहिता संपली आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकते. प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तो पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

तर चार महिन्यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्या आधी या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळणे अपेक्षित आहे, असे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा ‘डी’ आकाराच्या बोगद्यातून खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे जलसंपदा विभागाकडून निश्‍चित करण्यात आले आहे. सुमारे २८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा असणार आहे.

या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक्स होणार असून, ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.