Old Mumbai Pune Highway Tendernama
पुणे

Mumbai Pune Highway : काळ्या यादीतील कंत्राटदाराचा निकृष्ट 'कारभार'; मुंबई पुणे महामार्गाचे तीन-तेरा

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि आहे आता माहिती-तंत्रज्ञानाचे शहर असलेल्या पुण्यात लोकांचा ओघ वाढत आहे. पुणे-कोल्हापूर, पुणे-मुंबई, पुणे-नगर- नाशिक पुणे-सोलापूर आणि पुणे-औरंगाबाद या महामार्गांनी राज्यातील विविध गावे, शहरे पुण्याशी जोडली आहेत. पण या महामार्गांची क्षमता आणि त्यावरून दररोजच्या वाहतुकीचा बोजा याचे प्रमाण व्यस्त आहे. देखभालीअभावी रस्त्यांवरील खड्डे व वाहतूक कोंडी, अपघात हे तर नित्याचेच चित्र आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खड्ड्यांमधून प्रवास

राज्याची राजधानी मुंबई आणि विद्येचे माहेरघर पुण्याला जोडणारा पहिला महामार्ग म्हणून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाची ओळख आहे. सध्या वेगवान प्रवासासाठी द्रुतगती महामार्गाचा पर्याय उपलब्ध झाला असला, तरी जुन्या महामार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक असते; परंतु सध्या या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे.

खालापूरपासून पुढे खोपोलीदरम्यान महड फाटा ते शेडवली फाटा या सहा किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामाचा त्रास वाहनचालक आणि प्रवाशांना सोसावा लागत आहे. सध्या पावसामुळे अधिकच बिकट अवस्था झाली आहे.

अडचणींचा सामना

- खालापूर ते खोपोली फाटादरम्यानच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम २०१७ मध्ये ईगल इन्फ्रा कंपनीकडे दिले होते

- काळ्या यादीतील कंत्राटदाराच्या निकृष्ट काम केल्याने दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीवघेणे अपघात

- चार वर्षांपूर्वी हे काम पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविले, तरी अनेक ठिकाणी काम अर्धवट आहे

- प्रवासी व स्थानिकांच्या उद्रेकामुळे खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा पर्याय

- यंदा पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष

- जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलपासून काही अंतरावरील काळुंद्रे ते पळस्पे फाटादरम्यान ढाबा, चिकन-मटणच्या दुकानांमुळे गटारे गायब

- दरवर्षी हा रस्ता पाण्याखाली जात असल्याने येथे अनेक खड्डे पडले आहेत

- कोळखे, डेरवली या गावाजवळच्या रस्त्याची अक्षरशः चाळण

‘द्रुतगती’वर वेगमर्यादा ठरतेय घातक

एकूण ९४ किमी लांबीच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी ते खंडाळा बाह्यमार्ग अपघातमुक्त करण्यासाठी महत्त्वाचा बदल करण्यात येत आहेत. हलक्या वाहनांसाठी वेगमर्यादा ताशी ५० वरून ६० किलोमीटर करण्यात आली आहे.

पुण्याकडून मुंबईकडे येताना अतितीव्र उतार आहे. समतल भागातून १०० किमी प्रतितास वेगाने आडोशी भागात आल्यावर वाहनाचा वेग ५० किमी प्रतितासावर आणताना वाहनचालकांची कसरत होत आहे. वाहनांचा वेग जलदगतीने कमी केल्याने अपघातांचे प्रमाणदेखील अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.