Highspeed Railway Tendernama
पुणे

Mumbai - Hyderabad Highspeed Railway प्रकल्पाचे असे होणार भूसंपादन! अंतिम आराखडा सादर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्प मार्गी लागण्याच्यादृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) मागील आठवड्यात रेल्वे बोर्डाला सादर केला. मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येईल.

‘एनएचएसआरसीएल’च्या अधिकाऱ्यांनी नाव न देण्याच्या अटीवर ही माहिती दिली. ‘एनएचएसआरसीएल’ने देशात आठ ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे हैदराबाद असे दोन प्रकल्प आहेत. ही ट्रेन ताशी २५० ते ३२० किलोमीटर वेगाने धावणार आहे.

मुंबई ते हैदराबाद हे सुमारे ७११ किलोमीटर अंतर ही ट्रेन साडेतीन तासांत पार करणार आहे. या मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे असतील. या रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रॅक टाकण्यात येईल.

हा रेल्वे मार्ग ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील लोणावळा, देहू, सासवड या गावांच्या हद्दीतून जातो. मात्र ‘पीएमआरडीए’च्या विकास आराखड्यात मार्ग प्रस्तावित करण्यात आला नव्हता. तो समाविष्ट करावा म्हणून ‘एनएचएसआरसीएलने ‘पीएमआरडीए’ला यापूर्वी पत्र दिले होते. त्याची दखल घेऊन ‘पीएमआरडीए’ने प्रस्तावित विकास आराखड्यात हा मार्ग दर्शविला.

त्यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील मोठी अडचण दूर झाली. परंतु हाच रेल्वे मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ पैकी लोहगाव आणि फुरसुंगी या गावांच्या हद्दीतून जातो.

फुरसुंगी येथे महापालिकेकडून दोन नगररचना योजना (टीपी स्कीम) प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यांचे प्रारूप महापालिकेने प्रसिद्ध केले आहे. त्यावर हरकती-सूचनांसाठी लवाद नेमण्यात आला आहे. ही दोन गावे वगळता उर्वरित गावांच्या विकास आराखड्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. मात्र नगररचना योजना आणि प्रस्तावित विकास आराखड्यात महापालिकेकडून हा रेल्वे मार्ग दर्शविण्यात आलेला नाही.

महापालिकेने त्यास मान्यता दर्शविल्यानंतर सल्लागार कंपनीकडून रेल्वे मार्गिकेच्या आराखड्याचे काम पूर्ण करून अहवाल सादर करण्यात आला. ‘एनएचएसआरसीएल’कडून छाननीचे काम पूर्ण झाल्यानंतर मागील आठवड्यात आराखडा रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रकल्पाच्या ठळक बाबी

- अंदाजे खर्च १४००० कोटी रुपये

- ताशी २२० ते ३५० किलोमीटर वेगाने धावणार

- प्रवासी क्षमता ७५०

- भूकंप झाल्यास ब्रेकिंग सिस्टिम आपोआप कार्यान्वित होणार

- तातडीने भूकंप शोध आणि अलार्म सिस्टम (यूपीएडीएएस)

- मुंबई- हैदराबाद मार्गाची लांबी ७११ किमी

- काही मार्ग एलिव्हेटेड तर काही मार्ग भुयारी