Mumbai Pune Expressway Tendernama
पुणे

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 'आयटीएमएस' प्रणाली प्रयोग; देशातील पहिला महामार्ग

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरा व सेन्सर आता सज्ज झाले आहेत. ‘आयटीएमएस’चे (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) काम पूर्ण झाले असून त्याची सध्या चाचणी सुरू झालेली आहे. ऑगस्ट अखेरीस ‘आयटीएमएस’ प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. अशी प्रणाली असलेला द्रुतगती मार्ग हा राज्यातील पहिला महामार्ग ठरला आहे. यामुळे ‘आयटीएमएस’मुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राज्य सरकारकडून सुमारे ३४० कोटी रुपये खर्चून ‘आयटीएमएस’ यंत्रणा सुरू केली जात आहे. यात केवळ वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यात येणार आहे, असे नाही तर रस्त्यावर बसविण्यात आलेल्या सेन्सर मुळे एखादे वाहन रस्त्याच्या कडेला थांबले असेल तर त्याचे ठिकाण व अन्य माहिती नियंत्रण कक्षाला समजणार आहे. यासाठी ९४. ५ किलोमीटरच्या या मार्गावर १०६ ठिकाणी एकूण ४३० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कुसगाव येथे यासाठी विशेष असे ‘नियंत्रण कक्ष’ देखील स्थापन केले आहे. त्यातून ‘आयटीएमएस’चे काम चालणार आहे. वेगाने वाहन चालविणे, लेन कटिंग करणे आदींसह एकूण १७ प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे. यासाठी पाच प्रकारच्या कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला आहे.

ड्रोन व बाईक देखील मदतीला

१ वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी व अपघाताच्या प्रसंगी ड्रोनची मदत घेतली जाणार

२ अपघाताच्या ठिकाणी अगदी कमी वेळेत पोहोचण्यासाठी बाईकस्वारांची देखील मदत घेतली जाणार

३ या दुचाकीमध्ये मेडिकल किट देखील असणार आहे. त्यामुळे प्राथमिक स्वरूपाच्या वैद्यकीय मदतीसाठी हे उपयोगी ठरणार आहे.

४ कुसगाव येथे यासाठी विशेष ‘नियंत्रण कक्ष’

मोठे आकडे

प्रणालीसाठी आलेला खर्च - ३४० कोटी रुपये

महामार्गाची लांबी - ९४. ५ किलोमीटर

एकूण कॅमेरे - ४३०

‘आयटीएमएस’ का महत्त्वाचे

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’ प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला. मार्गावर वाहतुकीची शिस्त पाळली जावी, अपघात टळावेत, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, तसेच पथकर वसुली जलद, अचूक, तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मार्गावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असल्याने वाहनावर लक्ष ठेवणे सोपे जाते. वाहनांचा वेग तपासणारी ‘अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचा शोध घेणारी ‘लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’ असल्याने अपघात कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ‘आयटीएमएस’ असणे महत्त्वाचे आहे.

‘आयटीएमएस’ म्हणजे काय

‘आयटीएमएस’ म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचे नियंत्रण होईल. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’चे काम पूर्ण झाले आहे. सध्या या प्रणालीची चाचणी सुरू आहे. ऑगस्टअखेर ही प्रणाली कार्यान्वित होईल. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

- मनोज जिंदाल, सह व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई