Pune Tendernama
पुणे

Pune : मेट्रो, उड्डाणपुलाचे काम, दररोज 3 लाख वाहनांची ये-जा सांगा कशी सुटेल कोंडी?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषीजी चौकात मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. काही दिवसांत उड्डाण पुलाचेही काम सुरू होणार आहे. परंतु ही कामे होईपर्यंत हा चौक आणि बाणेर, औंध, पाषाण परिसरातील वाहतूक सहजतेने सुरू राहण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. या भागातून दिवसभरात सुमारे तीन लाख वाहने ये-जा करतात. मात्र वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिसांसह वॉर्डन मिळून केवळ १४ कर्मचारीच कार्यरत आहेत.

‘पीएमआरडीए’कडून मेट्रोसाठी विद्यापीठासमोरील चौकात सर्वांत मोठ्या खांबाचे (क्रमांक चार) काम सुरू आहे. बाणेरकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या वाहतुकीची एक लेन बंद केली आहे. बाणेरकडून येणाऱ्या रस्त्यावर असलेल्या बॅरिकेड्समुळे वाहनांना अडथळा होत आहे.

हे उपाय आवश्यक! रुंदीकरणाला हवी गती

सध्या गणेशखिंड रस्ता सुमारे ३६ मीटर रुंदीचा आहे. या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. ते झाल्यास हा रस्ता ४५ मीटरचा होईल. त्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी महापालिकेकडून या कामाला गती मिळणे गरजेचे आहे.

वाहतूक पोलिसांसह वाॅर्डनची संख्या वाढवावी

शहरातून विद्यापीठासमोरील चौकातून बाणेर, औंध, पाषाणमार्गे पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आणि मुंबईच्या दिशेने दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे तीन लाख इतकी आहे. परंतु या चौकात वाहतूक शाखेचे दोन पोलिस अधिकारी, सहा कर्मचारी आणि सहा वॉर्डन अशा केवळ १४ कर्मचाऱ्यांकडूनच वाहतूक नियमन केले जाते. तीन लाख वाहनांच्या नियमनासाठी कर्मचारीसंख्या अपुरी असून, येथे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

इतर उपाययोजना

औंधकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरून स्मशानभूमीकडे वळणाऱ्या वाहनांना बंदी घालावी.

पुढे राजीव गांधी उड्डाण पुलाकडून यू-टर्न घेऊन मुख्य रस्त्यावरून स्मशानभूमीकडे वाहतूक वळवली जावी. येथे वॉर्डनची नियुक्ती गरजेची

इंदिरा गांधी वसाहतीकडे व वसाहतीकडून मुख्य रस्त्यावर वळताना नियमांचे पालन होण्यासाठी वॉर्डन आवश्यक.

चतु:शृंगी पोलिस ठाण्याकडे वळताना मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळी. तेथेही वॉर्डन आवश्यक.

सुमारे ३ लाख - रोजच्या वाहनांची संख्या

१४ - कार्यरत पोलिस, वॉर्डन

३० मीटर - रस्त्याची रुंदी

२०२५ - मेट्र्रोच्या कामाचा कालावधी

ऑगस्ट २०२४ - उड्डाण पुलाच्या कामाचा कालावधी

शिवाजीनगर ते विद्यापीठ चौक (जाताना)

अंतर : ३.१

सकाळी : २४ मिनिटे

दुपारी : १२ मिनिटे

सायंकाळी : २० मिनिटे

विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर (येताना)

अंतर : ३.१

सकाळी : ३५ मिनिटे

दुपारी : १५ मिनिटे

सायंकाळी : ४० मिनिटे

अशी आहे स्थिती

बाणेर ते विद्यापीठ रस्ता

बाणेरहून विद्यापीठ ते छत्रपती शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. अरुंद रस्ते, विरुद्ध दिशेने येणारी वाहने यामुळे कोंडी वाढतच जाते. मुंबई-पुणे महामार्गावरील राधा चौक ते डी-मार्टपर्यंत सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी असते. या मार्गावर वाहन चालवणे व पादचाऱ्यांना चालणे जिकिरीचे बनले आहे. यासाठी डी-मार्ट ते हॉटेल सदानंददरम्यान वॉर्डन नियुक्त करण्यात यावा.

हभप. सायकर चौक, बालेवाडी फाटा ते सायकर चौकादरम्यान विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक थांबवली, तर बऱ्याच अंशी कोंडी कमी होईल. तसेच बालेवाडी फाटा ते सायकर चौकादरम्यान असलेल्या ऑर्किड शाळेजवळ आधीच रस्ता अरुंद आणि त्यातच पालकांची वाहने व स्कूलबस रस्त्यावर उभ्या केल्याने कोंडीत भर पडते. येथे बस अथवा चारचाकी वाहने थांबण्यास बंदी घालावी. सकाळनगर-यशदा ते विद्यापीठापर्यंत अरुंद रस्ता असल्याने वाहनांचा वेग मंदावतो.

औंध ते विद्यापीठ

औंधच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुख्य रस्त्यावरून वळताना वाहनांची गती कमी होते. पुणे-पिंपरी चिंचवडदरम्यान वाहतूक मंदावते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जुन्या जकात नाक्यापर्यंत कोंडी होते.

ब्रेमेन चौक

सांगवी, खडकी, बोपोडीकडून येणाऱ्या वाहनांसह औंधमधून, पोलिस वाहन कार्यशाळा व संघवीनगरमार्गे येणाऱ्या वाहनांमुळे या चौकात वाहतूक कोंडी होते. या भागात वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस किंवा वॉर्डन आवश्यक आहेत.

अडथळेच अडथळे

आनंद ऋषीजी चौक ते भोसलेनगरपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे

सेनापती बापट रस्त्याकडून औंध, बाणेर, पाषाणकडे जाताना विरुद्ध दिशेने येणारी वाहने.

कृषी-बॅंकिंग विद्यालयाजवळ दोन्ही बाजूंनी मेट्रोच्या खांब उभारणीमुळे रस्ता अरुंद

कृषी महाविद्यालया-जवळील अटलबिहारी वाजपेयी उड्डाण पुलावरून विद्यापीठाकडे जाताना आधीच रस्ता अरुंद, त्यात वाहतूक नियंत्रणाचा अभाव

जवाहर कॉलनी, शासकीय तंत्रनिकेतनजवळ रस्ता रुंदीकरण सुरू. तेथील अवजड वाहनांमुळेही कोंडी

चौकाच्या परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून, लेन मार्किंग नाहीत. या कारणांमुळे कोंडीत भर पडत आहे. या भागातील सर्व रस्त्यांवर किमान दोन किलोमीटरपर्यंत पुनर्डांबरीकरण करून लेन पट्टे मारणे आवश्यक आहे. या चौकासह चतुःशृंगीकडे जाणाऱ्या सेनापती बापट रस्ता जंक्शन येथे स्मार्ट सिटी योजनेतून सिग्नल बसवावेत. जेणेकरून वाहतूक कोंडीनुसार सिग्नलची वेळ बदलत राहील.

- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी या प्रमुख मार्गांवर ‘पीएमआरडीए’ने बस सुरू कराव्यात. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या बसचा फीडर म्हणून वापर करण्यात येईल. पादचाऱ्यांसाठी बॅरिकेड उभारून सुरक्षित मार्ग तयार करावा. केवळ वन-वे किंवा डायव्हर्जन करून प्रश्न सुटणार नाही. नो-पार्किंग झोन तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. तसेच, पार्किंगसाठी मोफत आणि सशुल्क जागा उपलब्ध करून द्यावी.

- प्रांजली देशपांडे, वाहतूकतज्ज्ञ

आचार्य आनंद ऋषीजी चौकातील कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहनचालकांसाठी खडकीसह इतर पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त पोलिस आणि वॉर्डन देण्यात येतील. याबाबत ‘पीएमआरडीए’ आणि महापालिकेशी समन्वय ठेवून प्रयत्न करीत आहोत.

- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा