Solapur Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : सोलापूरकरांसाठी वाईट बातमी; 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच...

टेंडरनामा ब्युरो

Solapur News सोलापूर : पावसाळ्यात ६४ टक्क्यांपर्यंत भरलेले उजनी धरण (Ujani Dam Water Level) सध्या १४ मे रोजी मायनस (उणे) ५० टक्क्यांवर पोचले आहे. मागील १० ते १२ वर्षांत मेच्या मध्यावतधीत (१४ मे) पहिल्यांदाच धरणातील पाणीसाठा उणे ५० टक्क्यांवर गेला आहे.

सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून सोडलेले पाणी २० मे रोजी औज बंधाऱ्यात पोचेल. त्यावेळी उजनी उणे ५७ ते ५८ टक्के होईल. २१ मे ते पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील उर्वरित मृतसाठा पिण्यासाठीच राखून ठेवावा लागणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ तथा दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात उजनी धरणाचा निर्णायक वाटा आहे. धरणामुळे रब्बीच्या जिल्ह्यात सर्वाधिक ४० हून अधिक साखर कारखाने उभारले. फळबागा वाढल्या असून कोरडवाहू किंवा हंगामी बागायती जमिनी ओलिताखाली आल्या आहेत. उजनीच्या पाण्यावर जिल्ह्यातील दीड लाखांहून अधिक क्षेत्र भिजते.

मात्र, यंदा सप्टेंबरमध्येच दुष्काळाची चाहूल लागलेली असतानाही पाण्याचे नियोजन व्यवस्थित झाले नाही. नोव्हेंबर- डिसेंबरनंतर लगेचच जानेवारी- फेब्रुवारीत पुन्हा पाणी सोडण्यात आले. अक्षरश: शेतकऱ्यांनी पाणी बंद करा म्हणून निवेदने दिली, काहींनी आंदोलनांचा इशाराही दिला होता.

दुसरीकडे सोलापूर शहराच्या जुनाट पाइपलाइनवरून नागरिकांची तहान भागत नसल्याने तीनवेळा औज बंधाऱ्यात पाणी सोडावे लागले. दीड-दोन टीएमसीची साठवण क्षमता असलेल्या या बंधाऱ्यापर्यंत पाणी पोचण्यासाठी धरणातून पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोडावे लागते.

आता धरण रिकामे झाले असून पावसाळा लांबल्यास जिल्ह्यातील टंचाई अधिकच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

२०१८-१९ मध्येही धरण उणे ५९ टक्के

पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात अशीच दुष्काळजन्य स्थिती उद्‌भवली होती. पाऊस देखील लांबणीवर पडला होता आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे २०१८-१९ मध्ये पुढच्या वर्षीचा पावसाळा सुरू होईपर्यंत धरण उणे ५९ टक्के झाले होते. मात्र, यंदा धरणातील पाणीसाठा उणे ६५ टक्क्यांहून अधिक खोलवर जाईल, अशी सद्य:स्थिती आहे.

पिराची कुरोलीतून पाणी पुढे

उजनी धरणातून सध्या सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात आले आहे. सहा हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला असून पिराचीकुरोली येथून पाणी पुढे औज बंधाऱ्याच्या दिशेने जात आहे. नदी पात्रातील बंधारे दोन मीटरने चढविले असून पाणी बंद केले तरी नदीतील सर्व बंधाऱ्याच्या ठिकाणी दोन मीटरपर्यंत पाणी राहणार आहे. जेणेकरून तेथून होणारा पाणीपुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.