Road Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

दोन कोटींच्या रस्त्यावर दोन महिन्यातच खड्डे; महापालिकेचे दुर्लक्ष

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : अनेक दिवस प्रशासनाच्या लालफितीत अडकलेला छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता दोन महिन्यापूर्वी दोन कोटी निधी खर्च करून तयार करण्यात आला होता. मात्र, या नव्या रस्त्यावर दोन ठिकाणी खड्डे पडले आहेत तर दोन ठिकाणी रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून २९ मार्च २०२४ रोजी या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. अवघ्या दोन महिन्यात या रस्त्याच्या मधोमध दोन खड्डे पडले आहेत. तर दोन ठिकाणी जलवाहिनीला जोड देण्यासाठी उकरलेला रस्ता खचण्याची भीती आहे. रस्त्यांवरील खड्डे व रस्ता खचण्याने वाहनधारकांना अडथळा होत आहे. पावसाचे पाणी साचल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या रस्ते विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्ते कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाची तांत्रिक तपासणी व गुणवत्ता तपासली नसल्याचा संशय व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही दोन महिन्यांत रस्ता खराब झाल्याने रस्ते कामाची चौकशी करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत

रस्ता करण्यापूर्वी जलवाहिनीचे जोडकाम करण्यात आलेल्या ठिकाणी खड्डा पडला आहे. जय मल्हार चौकात जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी साचले आहे. या रस्त्याची पाहणी केली आहे. संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. लवकरच या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे.

- प्रकाश दिवाणजी, उपअभियंता रस्ते विभाग, महापालिका