Irrigation Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

‘पुरंदर उपसा’साठी 4200 कोटींची तरतूद; शेतकऱ्यांसाठी वरदान

टेंडरनामा ब्युरो

माळशिरस (Malshiras) : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना, जानाई शिरसाई योजनांसारख्या उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्याकरता ४२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने पुरंदर, बारामती, दौंड, हवेलीच्या शेतकऱ्यांसाठी वरदायी असणारी पुरंदर उपसा सिंचन योजना निश्चितपणे गतिमान होणार आहे.

उपसा सिंचन योजनांसाठी मोठ्या अश्वशक्तीचे विद्युत पंप लागत असल्याने या योजनांवर वीज बिलाचा ज्यादा भार पडून पर्यायाने शेतकऱ्यांना ज्यादाची पाणीपट्टी भरावी लागते तसेच विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याने योजना देखील सुरळीतपणे चालण्यामध्ये अडचणी येतात. या सर्वांचा विचार करून राज्य सरकारने राज्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जा करणाच्या माध्यमातून सौर ऊर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी या योजना वरती ४२०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. याचा मोठा फायदा हा पुरंदर उपसा सिंचन योजनेला होणार आहे. पुरंदर, बारामती, दौंड, हवेली या चार तालुक्यातील २५ हजार हेक्टरवरून अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणारी पुरंदर उपसा सिंचन योजना ही सहा टप्प्यांमध्ये चालते. पूर्ण क्षमतेने सहा ही टप्प्यामध्ये ही योजना चालल्यास पहिल्या टप्प्यात २९२१ अश्वशक्तीचे तीन पंप आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये २७७४ अश्वशक्तीचे तीन पंप आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये २८४२ अश्वशक्तीचे तीन पंप आहेत. चौथ्या टप्प्यातही तिसऱ्या टप्प्याप्रमाणेच २८४२ अश्वशक्तीचे तीन पंप आहेत. तेथून पुढे शिंदवणे घाटावरील पंप हाऊस वरून माळशिरस व राजेवाडी वित्रीकेच्यााध्यमातून बारामती तालुक्यामध्ये प्रवाहाने सायपनद्वारे पाणी जात असले तरी पाचव्या टप्प्यामध्ये दिवे वितरिकेसाठी ५६० अश्वशक्तीचे दोन पंप आहेत व सहाव्या टप्प्यात ११० अश्वशक्तीचे दोन पंप आहेत.

योजना अखंडितपणे चालण्यास मदत

योजनेला एक एमसीएफटी पाण्यासाठी २०९३७ रुपये एवढे पैसे भरावे लागत आहे. सौर ऊर्जा करण्याच्या माध्यमातून हे सर्व पंप जर सौर ऊर्जेवर कार्यान्वित झाल्यास त्याचा निश्चित लाभ हे दर कमी होण्यास होणार आहे. तसेच वारंवार विद्युत पुरवठा नादुरुस्तीमुळे योजना बंद होण्याने योजनेत येणारी अडथळे नाहीसे होऊन, योजना अखंडितपणे चालण्यास मदत होणार आहे. यामुळे योजना शेतकऱ्यांना चालवण्यास परवडण्याबरोबरच गतिमान देखील होणार आहे.

उपसा सिंचन योजनांवर सर्वाधिक खर्च हा विद्युत बिलावर होतो. सौर ऊर्जेच्या माध्यमातून पुरंदर उपसा योजना कार्यान्वित झाल्यास निश्चित त्याचा लाभ होणार असल्याने सौर ऊर्जा करणाचा झालेला निर्णय स्वागतहार्य आहे .

- विजय कोलते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष