Vidhan Bhavan Tendernama
मुंबई

Tender Scam : 'त्या' 75 हजार कोटींच्या टेंडरमध्ये सत्ताधाऱ्यांनी लाटला टक्केवारीचा मलिदा? कोणी केला आरोप?

टेंडरनामा ब्युरो

Jitendra Avhad News मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्य सरकारने ७५ हजार कोटींच्या टेंडर (Tender) काढल्या. त्यांचा १०, २० टक्क्यांनी हिशेब केला तर लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात ७० ते ८० कोटी रुपये का देऊ शकणार नाहीत, असे वक्तव्य करत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ झाला. या वक्तव्याला भाजपचे अतुल भातखळकर, संजय कुटे यांनी जोरदार आक्षेप घेतला.

विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेत आव्हाड यांनी सरकारने केलेल्या घोषणांवर टीका केली. एका बाजूला कर्ज वाढत चालले असताना सरकार घोषणा करत सुटले असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ७५ हजार कोटींच्या टेंडर काढण्यात आल्या. त्यातून आलेल्या टक्केवारीतून, प्रत्येक मतदारसंघात ७० ते ८० कोटी रुपये गेल्याचा अप्रत्यक्ष आरोप आव्हाड यांनी केला. त्यांचा या आरोपाला आमदार अतुल भातखळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

भातखळकर म्हणाले, अर्थसंकल्पी चर्चेत खोटे आणि जातीयवादी आरोप करणे योग्य नाही. कामकाजातून ते शब्द काढून टाकावेत. ज्यांच्यावर मंत्री असताना अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांनी हे आरोप करू नयेत.

तर प्रत्येक मतदारसंघात ७०, ८० कोटी रुपये वाटल्याचा आरोप आव्हाड यांनी सिद्ध करावा, असे आव्हान संजय कुटे यांनी दिले.

माझ्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी राज्य सरकारला अनेक पत्रे दिली आहेत. मात्र एक दमडीही मिळालेली नाही. मी विरोधात बोलत असल्याने, माझा पराभव करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करून वेगळ्या पद्धतीने ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

- जितेंद्र आव्हाड, आमदार