Aditya Thackeray Tendernama
मुंबई

महायुतीच्या राजवटीत कंत्राटदार मित्रांसाठी मुंबईकरांची लूट; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महायुतीच्या राजवटीत कंत्राटदार मित्रांसाठी मुंबईकर करदात्यांच्या पैशांची लूट करण्यात आली असून याप्रकरणी आघाडी सरकार आल्यास निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाईचा इशारा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिला.

राज्यात आघाडी लवकरच स्थापन होणार असून, शिंदे सरकारच्या काळातील सर्व कामांना स्थगिती देण्याबरोबरच घोटाळ्यातल्या देयकांचे पैसेही थांबविणार आहोत, या घोटाळ्याची पूर्ण आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी कोणीही असो, त्यांना कडक शिक्षा होईल, याची काळजीही घेणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबईसाठी केलेला खर्चातील घोटाळा आता सहा हजार कोटींच्याही वर गेला आहे, त्यातच आता आणखी एका रस्त्यासाठी टेंडर काढले जाणार आहे. आम्ही पुन्हा एकदा त्यांचा घोटाळा उघड करण्याआधी, त्यांनी स्वतःहून या गोष्टींचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’च्या केली. मुंबईतील २०२३-२४ च्या रस्त्यांच्या कामांतील ६,०८० कोटींचा मेगा-रस्ता घोटाळा आम्ही उघड केला होता.

पालिकेच्या कंत्राटदारांना खूश करायचे असल्याने २०२२ या वर्षात रस्त्यांच्या कामाचे टेंडरच रद्द करण्यात आले. ज्या कंत्राटदारांनी कामाला विलंब केला आहे, काही कंत्राटदारांनी अद्यापही काम केलेले नाही. त्यांच्यावर काय कारवाई झाली, त्यापूर्वीच्या काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांची यादी, जानेवारी २०२३ च्या टेंडरची रक्कम आणि जाहीर केलेली आगाऊ रक्कम कंत्राटदारांना अदा केली गेली की नाही, जानेवारी २०२३ च्या टेंडर घोटाळ्यासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली का, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली.

मुंबई पैशांचे एटीएम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडे फक्त पैसे काढण्याचे एटीएम यंत्र म्हणून पाहतात; पण मुंबई ही आमच्यासाठी आई आहे, जिच्या सेवेसाठी झगडणे आमच्या रक्तातच आहे, असा टोलाही आदित्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.